अवघ्या राज्याला हुडहुडी
नाशिक ५.७ अंश सेल्सियस; मध्य महाराष्ट्र, विदर्भाला थंडीच्या तडाख्याची भीती
उत्तरेच्या दिशेने वाहत असलेल्या अतिथंड वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश भागात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यात किमान तापमानात घट होत असल्याने थंडी कायम आहे. गुरुवारी नाशिक येथे राज्यातील नीचांकी ५.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे नाशिककर चांगलेच गारठले आहेत.
बंगालच्या उपसागरावरून दमट वाऱ्यांचे प्रवाह मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग, कोकण आणि मराठवाडय़ाच्या दिशेने वाहात आहेत. त्यामुळे या भागातील किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे या भागात थंडी असली, तरी ती कमी आहे. दुसरीकडे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात शुक्रवारपासून पुढील दोन दिवस बहुतांश भागात थंडीची लाट येणार असून, या भागातील तापमान सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंशांनी कमी होण्याचा अंदाज आहे.
थंडीभान..
उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यातील बहुतांश भागातील किमान तापमानात घट होत असताना पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या दक्षिण परिसराच्या दरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे.
गारठलेली शहरे..
नांदेड, मालेगाव, बुलडाणा येथील किमान तापमान गुरुवारी सरासरीच्या तुलनेत तब्बल पाच अंशांनी घटले होते. त्यामुळे या भागात प्रचंड गारवा आहे. मुंबईचे किमान तापमान १७ अंशांवर असल्याने काहीसा गारवा जाणवतो आहे. पुण्यातील तापमान पुन्हा १० अंशांवर आले आहे. औरंगाबाद, नागपूर, अमरावती, यवतमाळ आदी भागांतील पारा १० अंशांच्या आसपास, तर चंद्रपूर, गोंदिया, अकोला आदी भागांतील किमान तापमानाचा पारा ११ अंशांच्या आसपास आहे.