#Lockdown: मंदिरं उघडण्यासाठी एमआयएम आक्रमक, औरंगाबादेत मंदिराच्या पुजाऱ्यांना निवेदन देणार
औरंगाबाद: अनलॉकच्या चौथ्या टप्प्यातही धार्मिक स्थळे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी न दिल्याने एमआयएम आक्रमक झालेली आहे. मंदिरं-मशिदी उघडण्यासाठी एमआयएमने मोहीम हाती घेतलेली आहे. मंदिरं उघडण्यासाठी पुजाऱ्यांना एमआयएम निवेदन देणार आहे. औरंगाबादमधील प्रसिद्ध खडकेश्वर मंदिरातील पुजाऱ्यांची एमआयएम भेट घेणार आहे. निवेदन देऊन मंदिर उघडण्याची विनंती करणार आहे. तर मशिदी उघडण्याची एमआयएमची मोहीम उद्यापासून सुरु होणार आहे. राज्य सरकारने एक सप्टेंबरपासून मंदिरं उघडावीत, आम्ही दोन तारखेला सर्व मशिदी उघडू, असे अल्टिमेटम एमआयएम नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विटरवरुन 27 ऑगस्टला ठाकरे सरकारला दिलेले होते.
“जेव्हा व्यवसाय, कारखाने, बाजारपेठा उघडल्या जातात, आणि बस, ट्रेन तसेच विमानाची उड्डाणे सुरु होतात, तेव्हा कोरोना फक्त धार्मिक स्थळांवर पसरेल, असे सरकारला कोणी सांगितले? सरकारच्या उत्पन्नाचे साधन असलेल्या मद्यविक्रीची दुकानेही उघडली जातात आणि मर्यादित संख्येने लोक लग्नासाठी एकत्र येऊ शकतात, तर केवळ धार्मिक स्थळे बंद का?” असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केलेला होता.
“आम्ही सर्व जण आपल्या वैद्यकीय पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सहा महिने थांबलो आणि सरकारला सहकार्यही केले होते. आता सर्व काही उघडलेले असताना फक्त धार्मिक स्थळे का बंद ठेवली जात आहे? अतार्किक. एक सप्टेंबरपासून सर्व मंदिरे उघडण्यासाठी महाराष्ट्र सरकारला माझा अल्टीमेटम आहे आणि आम्ही दोन सप्टेंबरपासून सर्व मशिदी उघडणार आहोत.” असे ट्वीट इम्तियाज जलील यांनी केलेले होते.