#Lockdown: टाळेबंदीमुळे मुद्रांक शुल्काचे ३०५० कोटींचे उत्पन्न बुडाले
राज्यभरात दररोज नऊ हजार दस्त नोंद होतात. दरवर्षी मार्च महिन्यात ३२०० कोटी, तर इतर महिन्यांमध्ये दर महिना सरासरी २५०० कोटी रुपयांचा महसूल शासनाला प्राप्त होतो, मात्र यंदा करोनामुळे १७ मार्चनंतर दस्त नोंदणीची कार्यालये बंद ठेवण्यात आली असल्यामुळे या विभागाचे आतापर्यंत तब्बल तीन हजार ५० कोटींपेक्षा अधिक उत्पन्न बुडाले आहे.
एप्रिल महिन्यात चालू बाजार मूल्य दरतक्त्याचे (रेडीरेकनर) नवे दर लागू होतात. त्यामुळे दरवर्षी मार्च महिन्यात ३२०० कोटींपर्यंत महसूल मुद्रांक व शुल्क विभागाला प्राप्त होतो. टाळेबंदी लागू होण्यापूर्वी १७ मार्चपर्यंत दस्त नोंदणीची कार्यालये सुरू होती, तोपर्यंत १८०० कोटी रुपयांचा महसूल शासनाकडे जमा झाला आहे. मार्च महिन्यातील उर्वरित दिवस दस्त नोंदणीची कार्यालये सुरू राहिली असती, तर ३२०० कोटी किंवा त्यापेक्षा अधिक महसूल शासनाकडे जमा करता आला असता, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक ओमप्रकाश देशमुख यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना दिली.