#LockDown | अर्थव्यवस्थेचा देखील विचार करावा लागेल – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन संपुष्टात येण्याच्या अवघ्या 6 दिवसांपूर्वी सोमवारी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. 3 मे रोजी लॉकडाउनचा दुसरा टप्पा संपुष्टात येत आहे. यामध्ये तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी हा लॉकडाउन 3 मे नंतरही ठेवण्याचा सल्ला केंद्र सरकारला दिला आहे. तसेच हॉटस्पॉट नसलेल्या ठिकाणी आर्थिक हालचाली, दुकाने सुरू करण्यावर सर्वच राज्यांचे एकमत दिसून आले आहे. या चर्चेला पंतप्रधानांसमवेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा उपस्थित आहेत. कोरोना व्हायरसवर पीएम मोदींनी मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधण्याची ही चौथी वेळ आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाउनमध्ये कोरोना व्हायरसचे प्रमाण कमी करण्यात मदत मिळाली असे म्हटले आहे. मोदींनी सांगितल्याप्रमाणे, देशाने आतापर्यंत दोन लॉकडाउन पाहिले आहेत. दोन्ही लॉकडाउन एकमेकांपासून वेगळे होते. आता आपल्याला पुढचा विचार करावा लागेल. येत्या काही महिन्यांत कोरोनाचे रुग्ण आणखी समोर येतील असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. येत्या काही दिवसांत लोकांना मास्क लावणे आणि तोंड झाकणे जीवनशैलीचा एक भाग वाटेल. तरीही यामध्ये कुठल्याही पसिस्थितीत तातडीने पावले उचलण्यास सर्वांनी प्राधान्य द्यायला हवे. यासोबतच, आर्थिक परिस्थितीचा सुद्धा विचार करावा लागेल असे पंतप्रधान म्हणाले आहेत.
या चर्चेत केरळच्या मुख्यमंत्र्यांनी दांडी मारली. त्यांनी आपल्या जागी राज्याच्या सचिवांना पाठवले. तसेच वेळ कमी असल्याने 9 मुख्यमंत्र्यांशीच बोलता आले.