#Lockdown:हळूहळू सगळं सुरु करतोय मात्र शिस्त पाळणं गरजेचं : मुख्यमंंत्री ठाकरे
मुंबई : पुढच्या 15 दिवसात देशात चित्र स्पष्ट होईल, कारण स्थलांतर मोठ्या प्रमाणात झालं आहे. राज्यातील जनतेलाही आपल्या घरी जाता येणार, आम्हाला सर्व सुरळीत करायचं आहे, पण कोरोनाला टाळून करायचं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज फेसबुक लाईव्ह संवादात बोलत होते. ते म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन आहे. 31 तारखेपर्यंत हा लॉकडाउन आहे. त्यानंतर काय? असा प्रश्न सगळ्यांपुढे असेलच. लॉकडाऊनचा प्रत्येकालाच कंटाळा आला आहे. ठाकरे म्हणाले की, एकदम लॉकडाऊन करणं हे जसं चुकीचं आहे तसं तो एकदम उठवणंही चुकीचं आहे. हळूहळू सगळं सुरु करतो आहोत मात्र गर्दी झाली तर पुन्हा सगळं बंद करावं लागणार असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
ते म्हणाले की, दुकानं उद्योगधंदे, व्यवसाय सगळं सुरु होईल. मात्र शिस्त पाळली गेली नाही तर सगळं बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. पुढच्या 15 दिवसात देशाचं चित्र स्पष्ट होईल, कारण स्थलांतर मोठ्या प्रमाणात झालं आहे असं मी सोनिया गांधी यांच्यासह झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगितलं. सध्या महाराष्ट्रात 50 हजार उद्योग सुरु झाले आहेत. सहा लाख कामगार हे कामावर रुजू झाले आहेत हळूहळू सगळ्या गोष्टी आपण सुरु करतो आहोत. मात्र हे सगळं करत असताना स्वयंशिस्त पाळली जाणं अत्यंत गरजेचं आहे. जर शिस्त दिसली नाही, गर्दी झाली तर मात्र सगळं काही पुन्हा बंद करावं लागेल, असं ठाकरे म्हणाले.