#LockDown|लॉकडाऊनमुळे देशातील 13 कोटी लोक बेरोजगार
नवी दिल्ली | चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक देशात आपआपल्या पातळीवर लॉकडाऊन करण्याचे प्रयत्न केले. भारतातही 24 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आलं आहे. 17 मेपर्यंत तिसऱ्या टप्प्यातील हा लॉकडाऊन असणार आहे.
कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले. छोट्या उद्योगांना टाळं लागलं तर काही कंपन्यांनी उलाढालल न झाल्यानं कर्मचारी कमी करणं किंवा पगार न देण्याचं ठरवलं. या कोरोनामुळे हातावर पोट असणाऱ्या कामगाराची कामं देखील बंद झाली. आघाडीच्या क्षेत्रातील थिंक टँकनं दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊनमुळे देशातील 12.2 कोटी लोकांच्या रोजगारावर कुऱ्हाड पडली आहे. लॉकडाऊन वाढवल्यानंतर या काळात हातात काम नसणाऱ्या बेरोजगारांची संख्या 12.2 कोटींवर पोहोचल्याची माहिती मिळत आहे. सेंटर ऑफ मॉनिटरिंग इकॉनॉमी या संस्थेनं ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.