‘मुंबईतील शिवाजी पार्कवर नमाज पठण करू द्या’; औरंगाबादच्या वकिलाने केली मागणी
औरंगाबाद |
राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या घरासमोर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणण्याची मागणी केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. त्यातच आता औरंगाबादच्या एका व्यक्तीने मुंबईतील शिवाजी पार्कवर (Shivaji Park) नमाज पठण (Namaz Recitation) करू देण्याची मागणी केली आहे. नईम शेख असे या व्यक्तीचे नाव आहे, शेख हे व्यवसायाने वकील आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, वकील नईम शेख यांनी रमजान ईदला शिवाजी पार्कवर नमाज पठण करण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून शेख यांनी ही मागणी केली आहे. मुंबई आणि परिसरात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव आहेत. त्यांना नमाज अदा करायला दुसरी मोठी जागा नाही. त्यामुळे हे मैदान नमाज पठणासाठी देण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे.
हे मैदान बाल दिन, महाराष्ट्र दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस, गुढी पाडवा, दसरा मेळावा अशा सर्व सण आणि विशेष दिवसांसाठी दिले जाते. या बाबींसाठी ५ दिवस हे मैदान राखीव आहे. त्यामुळे शासनाने ठरवून एक दिवस हे मैदान नमाज अदा करायला देण्यास काहीच हरकत नाही, असे या पत्रात म्हटले आहे. यामुळे आता एक नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. तर, यावर बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, ‘औरंगाबादच्या वकिलांनी शिवाजी पार्कवर नमाजाची परवानगी मागितली आहे. मात्र, हिंदू जर घरात पूजा करतात, तर मग नमाज रस्त्यावर कशाला पढायला हवी? तुम्ही घरातच नमाज अदा करा ना.’