५०० रुपयांच्या बनावट नोटांमध्ये वाढ, रिझर्व्ह बँकेचा अहवाल जारी..
![The number of counterfeit Rs 500 notes increased by around 14.4% in one year](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/500-note-rbi-780x470.jpg)
RBI : रिझर्व्ह बँकेने देशातील सर्वात जास्त मूल्याच्या ५०० रुपयांच्या नोटांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. आरबीआयने काल (३० मे) जारी केलेल्या वार्षिक अहवालानुसार, सन २०२१-२२ मध्ये ५०० च्या ७९,६६९ बनावट नोटा जप्त केल्या होत्या. सन २०२२-२३ मध्ये ही संख्या वाढून ९१,११० झाली. यावरून ५०० रुपयांच्या बनावट नोटांची संख्या एका वर्षामध्ये सुमारे १४.४% वाढली आहे.
तर मार्च २०२३ अखेरिस ५०० रुपयांच्या ५,१६,३३८ नोटा चलनात होत्या. त्याचे मूल्य 25.81 कोटी रुपये आहे. २०२२-२३ मध्ये एकूण २.२५ लाख बनावट नोटा जप्त केल्या. त्याचे मूल्य ७.९ कोटी रुपये आहे.
सन 2016-17 च्या नोटबंदीवेळी एकूण 7.62 लाख बनावट नोटा (मूल्य ४३.२९ कोटी रु.) जप्त झाल्या होत्या. त्यात ५०० रु. च्या बनावट नोटा ३.१७ लाख (मूल्य १५.८७ कोटी रु.) होत्या.
२०२२-२३ मध्ये १३,५३० फसवणुक प्रकरणे समोर आली आहे. अनेक लोकांसोबत फसवणूक झाल्याने त्यांनी ३०,२५२ कोटी रुपये गमावले आहेत. २०२१-२२ मध्ये ९,०९७ प्रकरणे समोर आली असून ५९,८१९ कोटी रुपयांना गंडा घातला आहे.
तर दुसरीकडे यंदाच्या आर्थिक वर्षात विकास दर ६.५% राहील असा अंदाज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वर्तवला आहे. आगामी काळात खाद्यपदार्थांची महागाई नियंत्रणात राहील. सेवा क्षेत्रात निर्यात वाढ तसेच आयात वस्तूंच्या किमती घटल्याने वित्तीय तूट कमी राहील. जागतिक बाजारातील पुरवठ्यात भारताचा वाटाही वाढेल. परदेशी गुंतवणूकदारांसाठी अनुकूल परिस्थिती राहील. त्यामुळे परदेशी गुंतवणूकही वाढणार आहे.