शिर्डी विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचे उदघाटन आणि भूमिपूजन देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते
योजना स्थगिती करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उच्च न्यायालयात
शिर्डी : लाडक्या बहिणींनो सावत्र भावांपासून सावध रहा. त्यांच्या पोटात दुखायला लागले. ही योजना म्हणजे सरकारी पैशांचा चुराडा असे म्हणत, स्थगिती घेण्यासाठी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उच्च न्यायालयात गेले. आदित्य ठाकरे म्हणतात, त्यांची सत्ता आली, तर आमच्या सरकारच्या सर्व योजना बंद करू. विरोधी पक्षातल्या एक महिला नेत्या म्हणतात, ही लाच आहे. तुम्हाला लाचखोर म्हणण्याचा विरोधी पक्षांना अधिकार नाही. मुख्यमंत्री आणि आम्ही दोघे उपमुख्यंत्री असे तिघे भाऊ ही योजना पुढील पाच वर्षे चालविणार आहोत, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार आशुतोष काळे, आमदार मोनिका राजळे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी आधिकारी आशिष येरेकर, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी आधिकारी गोरक्ष गाडीलकर आदी याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी जिल्हाभरातून महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे उदघाटन आणि भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते झाले.
फडणवीस म्हणाले, की राज्यातील १ कोटी ९० लाख बहिणींच्या खात्यात योजनेचे पैसै जमा करण्यात आले. उर्वरित ६० लाख बहिणींना लवकरच मिळतील. एकाही बहिणीला दिवाळीच्या ओवाळणीपासून वंचित ठेवणार नाही. महिलांना विकासाच्या प्रवाहात आणल्याशिवाय विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होणार नाही.
ही संकल्पना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाडकी बहीण आणि लखपती दिदी सारख्या योजना सुरू केल्या. मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील एक कोटी महिलांना लखपती दिदी करण्याचे उद्दिष्ट महायुती सरकारने ठेवले आहे. बस प्रवासामध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत दिल्याने एसटी नफ्यात आली. मुलींना आता ५०६ व्यावसासिक अभ्यासक्रमांचे शिक्षण मोफत मिळणार आहे.
विखे पाटील म्हणाले, की शिर्डीतील विविध विकासकामांचा भूमिपूजन व उदघाटन समारंभ हा माझ्या राजकीय जीवनातील ऐतिहासिक क्षण आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यात ११ लाख महिलांना लाभ मिळाला आहे. नेवासे येथील श्रीक्षेत्र ज्ञानेश्वर सृष्टी आणि अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा.
माजी खासदार कै. बाळासाहेब विखे पाटील यांनी पश्चिमेचे पाणी पूर्वेला आणून अहमदनगर, नाशिकसह मराठवाड्यातील दुष्काळ हटविण्याची योजना मांडली होती. महायुती सरकारने ती प्रत्यक्षात आणायचे ठरवले आहे. ५३ टीएमसी पाणी इकडे वळविण्यास आम्ही मंजुरी दिली. त्याची निविदा देखील जाहीर केली. सोलर फीडरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे धोरण आहे.





