Section 144 applies in Delhi: राहुल गांधींच्या पायी मार्चला परवानगी नाकारली
![Section 144 applies in Delhi: Rahul Gandhi's foot march denied permission](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Rahul-Gandhi-2.jpg)
नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी आज कृषी कायद्यांविरोधात राष्ट्रपती भवनाच्या दिशेने पायी मार्च काढणार आहेत. मात्र पोलिसांनी या मार्चला परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी केवळ तीन नेत्यांनाच राष्ट्रपती भवनाकडे जाण्यास परवानगी दिली आहे. तसेच दिल्लीत 144 कलम लागू करून जमाव बंदीही लागू करण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधी पायी मार्च काढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राहुल गांधी हे काँग्रेस नेत्यांसोबत राष्ट्रपती भवनापर्यंत मार्च काढणार आहेत. यावेळी ते राष्ट्रपतींना 2 कोटी शेतकऱ्यांचे निवेदन देणार आहेत. तर दुसरीकडे ‘आम्ही या मार्चला परवानगी दिलेली नाही. ज्या नेत्यांना राष्ट्रपती भवनाने भेटण्याची परवानगी दिली आहे. त्यांनाच केवळ राष्ट्रपती भवनाकडे जाता येणार आहे’, असे नवी दिल्लीचे अतिरिक्त पोलीस आयुक्त यांनी म्हटले आहे.
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 29वा दिवस आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात हे आंदोलन सुरू आहे. यादरम्यान सरकार आणि कृषी संघटनांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. परंतु अद्याप या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही. केंद्र सरकार कृषी कायद्यात सुधारणा करण्यास तयार आहे. मात्र शेतकरी संपूर्ण कायदाच रद्द करा, या मागणीवर ठाम आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला काँग्रेसने यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचाच भाग म्हणून राहुल गांधी आज दुसऱ्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेत आहेत.