एस. जयशंकर चीन दौऱ्यावर; भारत-चीन संबंध सुधारण्याचे संकेत

बीजिंग : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर तीन दिवसांच्या चीन दौऱ्यावर असून, त्यांनी सोमवारी चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान भारत-चीन संबंध, व्यापार, सीमा प्रश्न आणि शांघाय सहकार्य संघटना (SCO) संदर्भात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. जयशंकर यांची ही भेट २०२० मधील गलवान संघर्षानंतरचे दोन्ही देशांतील संबंध नव्याने प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.
जयशंकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, “आज बीजिंगमध्ये आल्यानंतर उपराष्ट्रपती हान झेंग यांना भेटून आनंद झाला.” त्यांनी चीनच्या एससीओ अध्यक्षपदासाठी भारताच्या पाठिंब्याची माहिती दिली आणि द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर भर दिला. जयशंकर हे तियानजिन येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्ट्र मंत्री बैठकीला हजर राहणार आहेत. या बैठकीला सर्व सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री उपस्थित राहतील.
हेही वाचा – महसूल खात्यातील 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांना लोकसेवा आयोगाकडून पदोन्नती; केंद्राकडून IAS दर्जा प्राप्त
गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये मोठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये विविध पातळ्यांवर चर्चा सुरू राहिल्या. या भेटीदरम्यान सीमेवर शांतता राखण्याचा आणि द्विपक्षीय व्यापार संबंध अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
चीन आणि पाकिस्तानमधील जवळीक सर्वश्रुत आहे. मात्र जयशंकर यांची ही भेट चीन-भारत संबंध सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे. यामुळे भारत व चीनमधील राजनैतिक आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे, ज्याचा अप्रत्यक्ष परिणाम पाकिस्तानवर होऊ शकतो. भारत-चीन मैत्रीच्या शक्यता वाढत असल्याने चीनने पाकिस्तानवरील आपली पूर्वीइतकी अवलंबनता कमी केल्यास, पाकिस्तानच्या रणनीतीत मोठे बदल करण्याची वेळ येऊ शकते.





