“देशाला शक्तिशाली बनविणे आवश्यक”; उपराष्ट्रपती राधाकृष्णन

C. P. Radhakrishnan : भारताला जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र बनवण्याचा उद्देश हा इतर देशांवर वर्चस्व गाजवण्याचा नसून, कोणीही भारतावर अटी लादण्याचे धाडस करू नये, यासाठी आहे, असे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी बुधवारी स्पष्ट केले.
सीएमआर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या रौप्य महोत्सवी समारंभात बोलताना त्यांनी सांगितले की भारत आता केवळ तंत्रज्ञानाचा स्वीकार करणारा देश राहिलेला नाही, तर तंत्रज्ञानाचा निर्माता म्हणून उदयास येत आहे.
डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि मेक इन इंडिया यांसारख्या उपक्रमांमुळे देशातील उद्योजकीय परिसंस्था अधिक सक्षम झाली आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा –कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी ९० हजार कोटींचा प्रकल्प – राधाकृष्ण विखे
२०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला सर्वात शक्तिशाली राष्ट्र बनावे लागेल. आपण इतरांवर अन्याय्य नियम लादू इच्छित नाही, पण भारतावर कोणीही अटी लादू नयेत, असे उपराष्ट्रपती म्हणाले.
जागतिक पातळीवरील हवामान बदल, सायबर सुरक्षेचे धोके, एआयचा नैतिक वापर आणि तंत्रज्ञानाची समान उपलब्धता ही मोठी आव्हाने असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, हीच आव्हाने नवोपक्रम आणि नेतृत्वासाठी संधीही देतात, असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, तरुणांनी ड्रग्जपासून दूर राहावे आणि सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. या कार्यक्रमाला कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.




