‘जमात-ए-पुरोगामीं’ ची हार, तोंड दाबून, बुक्क्यांचा मार !

पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यातील पहलगाम मध्ये टिपून टिपून हिंदूंवर केलेला भ्याड हल्ला..त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीमनं अत्यंत नियोजनबद्ध रीतीनं पाकिस्तानवर केलेला प्रहार.. त्याचे भारतात आणि जगभर होत असलेलं कौतुक..विशेषतः भारतीय जवानांनी केलेली अतुलनीय कामगिरी, हे सगळं कसं अगदी दृष्ट लागण्यासारखं घडलं ! पण, आपल्या देशात एक कायम गरळ ओळखणारी टोळी आहे..जमात-ए-पुरोगामी !.. त्यांना हे सगळं कसं सहन होईल बरं ? नको तिथं आग लागली आहे आणि संपूर्ण देशभर ‘बर्न ऑल’ शोधत फिरत आहेत, बिचारे !
पुरोगामी जोकरांकडून करमणूक..
‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाल्याच्या बातम्या बुधवारी सकाळपासूनच सर्व सोशल मीडियावरून दूरवर ऐकवल्या गेल्या आणि रॉकेटच्या बुडाला लागते तशी आग देशातील पुरोगाम्यांच्या बुडाला लागली ! मोदींचे तर कौतुक करायचे नाही, मग, सैन्य कसे भारी, पूर्वीचे मनमोहन सिंग सरकार कसे भारी, अशा तारेवरच्या कसरती करत डोंबाऱ्याचा खेळ खेळणाऱ्या या जमातीची कमालीची कोंडी झाली आणि त्यांनी करमणुकीचा एक फडच उभा केला !
चला, लष्कराचे कौतुक ऐकू या..
‘ऑपरेशन सिंदूर’ कमालीचे यशस्वी झाल्यामुळे उघड विरोध तर करता येत नव्हता, कारण ते त्यांच्या ‘एथिक्स’ मध्ये बसत नाही. शिवाय, अशा वेळी लोकच शेण घालतील तोंडात ! पण मोदी सरकारला श्रेय तर चुकूनही द्यायचे नाही. या पार्श्वभूमीवर ‘जमात-ए-पुरोगामी’ ने सर्व श्रेय लष्कराला देणाऱ्या पोस्ट टाकून अक्षरशः पाऊस पाडला, जणू काही सैन्यच स्वतःहून नियंत्रण रेषा पार करायचा, एअर स्ट्राईक करायचा निर्णय घेतं, प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं ठरवतं.. पण जाऊ दे, हेही नसे थोडके!
जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारी जमात..
पण हे शक्य असतं तर २६/११ मध्ये मुंबईत जे इतके भयानक पाकिस्तान प्रणित दहशतवादी हल्ले झाले, त्याचे प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने एअरस्ट्राईक्स नसते का केले ? आपले जवान, आपले लष्कर आणि आपली सैन्यशक्ती तेव्हाही इतकीच सक्षम होती की ! याकडे, या जमातीने जाणीवपूर्वक कानाडोळा केला, हे लक्षात आलं असेलच..
हेही वाचा – एआय तंत्रज्ञानावर आधारित सीसीटीव्ही लवकरच कार्यान्वित, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
परिस्थिती तेव्हाची आणि आत्ताची !
थोडे आठवा, २६/११ चा मुंबईतील दहशतवादी हल्ला आणि पहलगामचा दहशतवादी हल्ला.. तेव्हाचे भीषण राजकीय मौन आणि नेभळटपणा विरुद्ध आता दोन आठवड्यांच्या आत दिलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ चे दणदणीत प्रत्युत्तर यात फरक काय ? एकीकडे भारताचे गलीतगात्र नेतृत्व आणि दुसरीकडे आव्हानांचा गोवर्धन गिरी करंगळीवर तारणारे नेतृत्व.. फरक स्पष्ट आहे, पण तो मान्य करण्याची मानसिकता या जमातीकडे नाही, तो विचार करण्याची कुवतही त्यांच्याकडे नाही ! फरक आहे राजकीय इच्छाशक्तीचा, सैन्यामागे सर्व शक्तीनिशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या सशक्त नेतृत्वाचा. ’घरमें घुस के मारेंगे’ म्हणणाऱ्या विजिगिषु वृत्तीचा !
थोडासा बुद्धीला ताण देऊ या !
२६/११ च्या वेळी भारताचे वायुदल प्रमुख असलेल्या एअर चीफ मार्शल फली मेजर यांनी बालाकोट एअरस्ट्राईकनंतर दिलेल्या एका मुलाखतीत हे अगदी थेट आणि स्पष्टपणे सांगितलं होतं की ‘भारताची राजकीय इच्छाशक्ती बदलली आहे.’ त्यांच्यानंतरचे वायुदल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी तर ‘व्हीजेटीआय’ च्या शेकडो विद्यार्थ्यांसमोर स्पष्टपणे सांगितलं होतं, की २६/११ नंतर वायुदलाने पाकिस्तानात घुसून तिथले दहशतवादी तळ नष्ट करण्याचा पूर्ण प्लॅन तत्कालीन मनमोहन सिंग सरकारला दिला होता, पण आपली आंतरराष्ट्रीय प्रतिमा जपण्यासाठी त्यांनी या प्लॅनला स्पष्ट शब्दात नकार दिला होता म्हणून !
कोणीही यावे, टपली मारून जावे..
स्वतः कमालीचे कमकुवत, निर्णय घेण्यास अक्षम असे तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि आपली छबी जपण्याच्या हव्यासात हरवलेल्या सोनिया गांधी यांनी लष्कराला पूर्ण मोकळीक दिली नाही आणि राष्ट्रीय सुरक्षेचं राजकारण केलं. परिणाम काय झाला? आजही आपण २६/११ ला जबाबदार असलेल्या पाकिस्तान मधल्या लोकांना शिक्षा करू शकलेलो नाही. २००८ मध्ये भारताची परिस्थिती आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणीही यावे, टपली मारून जावे, अशीच होती.
आज परिस्थिती काय आहे?
भारताने पाकिस्तानात थेट १०० किलोमीटर आत घुसून हल्ले केले, न अमेरिकेने एक चकार शब्द उच्चारला, न इस्लामी देशांनी. इराण पासून अफगाणिस्तानसारखे इस्लामी कट्टरतावादी देश देखील पाकिस्तानच्या विरोधात आहेत. मोदींचे परराष्ट्र धोरण जर इतके सशक्त नसते, तर हे शक्यच नसते, पण सुमार डोक्याच्या विचारवंतांना हे कोण सांगणार?
याला म्हणायचं, घुसून मारले !
पहलगाम हल्ल्यानंतर फक्त एका पंधरवड्यात भारतीय सैन्याने पाकिस्तानात नऊ वेगवेगळ्या ठिकाणी घुसून अचूक आणि थेट कारवाई केली, तीही केवळ नियंत्रण रेषेपलीकडेच नाही, तर पाकिस्तानी पंजाबमध्ये तब्बल १०० किलोमीटर आत असलेल्या बहावलपूरपर्यंत. हे सारे स्ट्राईक्स प्रिसिजन स्ट्राईक होते, म्हणजे दहशतवादी ट्रेनींग सेंटर नेमके कुठे आहेत याची पक्की माहिती काढून अतिशय नेटकेपणाने हे स्ट्राईक्स प्लॅन केले गेले होते. हे काही एका दिवसात घडत नाही, किंवा फक्त लष्कर हा निर्णय घेत नाही, घेऊ शकत नाही !
पाठीशी खंबीर नेतृत्व असणे महत्त्वाचे !
हे एअरस्ट्राईक्स आपले सैन्य किंवा वायुदल अचानक अधिक सक्षम झाल्यामुळे घडले नाहीत. आपले जवान नेहमीच सक्षम होते. फरक इतकाच आहे की आता त्यांच्या पाठीशी खंबीर राजकीय नेतृत्व उभं आहे. ऑपरेशन सिंदूरचे श्रेय फक्त लष्कराचं श्रेय आहे, मोदींचं नाही म्हणणाऱ्या बिनडोक मोदीद्वेष्ट्यांनी जराशी स्वतंत्र विचार करण्याची क्षमता विकत घ्यावी.. त्यांचा पुरोगामीत्वाचा बुरखा टराटरा फाटला आहे, हे नक्की!
महिलांचा केवढा मोठा सन्मान !
फक्त हिंदू पुरुषांना टार्गेट करून २६ हिंदू स्त्रियांना विधवा करणाऱ्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केलेल्या लष्करी कारवाईला मुद्दाम समजून उमजून ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव देणे, कारवाईची अचूक वेळ, दोन स्त्री ऑफिसर, एक हिंदू आणि एक मुस्लीम यांची पत्रकार परिषदेसाठी निवड करणे, त्यातही नॉन-कॉम्बॅट सिग्नल कोअर शाखेतील कर्नल सोफिया कुरैशी यांची पत्रकार परिषदेसाठी निवड करणे, हे सगळं योगायोगाने झालं असं वाटतंय का? त्याच वेळी, पंतप्रधानांनी स्वतः महिला राष्ट्रपतीना ब्रिफ करायला जाणं, ही काय आपोआप घडून आलेली गोष्ट आहे का?
याला म्हणायचे कणखर नेतृत्व..
ही सर्व उच्च स्तरावर आखलेली एक रणनीती आहे, एका अशा नेतृत्वाने मांडलेला हा बुद्धिबळाचा डाव आहे, ज्याला प्रतिकं, टाईमिंग, दृश्य परिणाम या सर्वांची जबरदस्त समज आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे नेतृत्व निर्णायक कृती करणारे नेतृत्व आहे, नुसतेच ‘हम देखेंगे, हम करेंगे’ म्हणणारे नेभळट मनमोहन सिंगी नेतृत्व नाही आहे. आज भारताचा पंतप्रधान खंबीर नरेंद्र मोदी आहे, नेभळट मनमोहन सिंग नाही आणि फरक तिथेच आहे. अर्थात ते मोदी द्वेषाने आंधळ्या झालेल्या स्वघोषित विचारवंत लोकांना कळत नाही, किंवा त्यांना ते कळून घ्यायचं नाहीय. देशातल्या सर्वसामान्य नागरिकाला मात्र ते स्पष्ट दिसतंय, कळतंय, जाणवतंय, आणि म्हणूनच दहा वर्षे झाली तरी मोदींचा व्यक्तिगत जनाधार कमी होत नाही ! ‘जमात ए पुरोगामी’ मंडळींना एवढेच सांगणे आहे की, आग लागून भाजलेल्या ठिकाणी लावण्यासाठी ‘बर्न ऑल’ च्या फॅक्टऱ्या काढा, तेवढाच एक मोकळ्या वेळातला उद्योग तुम्हाला राहिला आहे.