पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचे जोरदार प्रत्युत्तर; ५ अतिरेक्यांची घरे जमीनदोस्त

Pahalgam Terrrorist Attack | जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार आणि लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली आहे. या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. प्रत्युत्तर म्हणून लष्कराने आतापर्यंत पाच दहशतवाद्यांची घरे नियंत्रित स्फोटकांच्या मदतीने उद्ध्वस्त केली आहेत. ही कारवाई कुलगाम, शोपियाँ, अनंतनाग, अवंतीपुरा आणि पुलवामा जिल्ह्यांमध्ये करण्यात आली.
लष्कराची कारवाई: दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले
पीटीआयच्या माहितीनुसार, कुलगाममधील झाकीर अहमद गनी आणि शोपियाँ जिल्ह्यातील छोटीपोरा येथील लष्कर-ए-तैयबाचा कमांडर शाहिद अहमद कुट्टय यांची घरे स्फोटकांनी पाडण्यात आली. शाहिद अहमद गेल्या तीन ते चार वर्षांपासून राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सक्रिय होता. याआधी लष्कराने अनंतनागच्या बिजबेहरा येथील आदिल हुसैन ठोकेर (उर्फ आदिल गुरी), अवंतीपुरातील आसिफ शेख आणि पुलवामातील एहसान शेख यांच्या घरांचे पाडकाम केले होते.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमधील ‘आरपीआय’ कार्यकर्त्यांना मिळणार बळ!
गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनुसार, आदिल हुसैन ठोकेरने २०१८ मध्ये अटारी-वाघा सीमेद्वारे पाकिस्तानात कायदेशीर प्रवेश मिळवला होता. मागील वर्षी तो गुप्तपणे जम्मू-काश्मीरमध्ये परतला. पाकिस्तानात त्याने दहशतवादी प्रशिक्षण घेतल्याचा संशय आहे. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
नियंत्रित स्फोटकांचा वापर, नागरिकांच्या सुरक्षेची काळजी
लष्कराने दहशतवाद्यांची घरे पाडताना नियंत्रित स्फोटकांचा वापर केला, जेणेकरून आजूबाजूच्या घरांना आणि सामान्य नागरिकांना कोणतीही हानी पोहोचणार नाही. या कारवाईदरम्यान स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली.