Pahalgam Terrorist Attack | भारताने पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर घातली बंदी, राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी मोठा निर्णय

Pahalgam Terrorist Attack | जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली असून, आता आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व प्रकारच्या आयातीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानमधून सर्व वस्तूंवर आयात बंदी
वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पाकिस्तानमधून भारतात येणाऱ्या सर्व वस्तूंची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात, मग ती मुक्तपणे आयात करता येण्याजोगी असो वा नसो, पुढील आदेश येईपर्यंत पूर्णपणे प्रतिबंधित असेल. यामध्ये पाकिस्तानातून थेट येणाऱ्या वस्तूंसह, तिसऱ्या देशांमार्फत अप्रत्यक्षपणे भारतात येणाऱ्या पाकिस्तानी वस्तूंवरही बंदी घालण्यात आली आहे. या निर्बंधातून कोणत्याही अपवादासाठी भारत सरकारची विशेष परवानगी आवश्यक असेल, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा : महाराष्ट्रात हवामानाचा वेगळाच खेळ: पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, विदर्भात जोरदार पाऊस
पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला फटका
भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. भारत हा पाकिस्तानच्या निर्यातीसाठी महत्त्वाचा बाजार होता. यापूर्वी भारताने सिंधू जल करार स्थगित केला, पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले आणि पाकिस्तानी विमानांसाठी भारतीय हवाई क्षेत्र बंद केले होते. आता आयात बंदीमुळे पाकिस्तानच्या व्यापारावर आणखी दबाव वाढणार आहे.