कोरोनामुळे ‘या’ जोडीने थेट विमानातच बांधली लग्नगाठ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/187584954_324489525698961_1088736168213345831_n-4.jpg)
चेन्नई – कोरोना संकटामुळे सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी विविध राज्यात सरकारने कठोर निर्बध लागू केल्याने लग्नाच्या या मौसमात अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे काही लोक तर अतिशय साध्या पद्धतीने कमी लोकांच्या उपस्थितीत विवाहसोहळा उरकून घेताहेत. मात्र तमिळनाडूच्या मदुराईमधून एक आगळावेगळा प्रकार समोर आला आहे. जमिनीवर कोरोना असल्याने येथील एका जोडप्याने चक्क आकाशात लग्नगाठ बांधली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सात वाजता या विवाहाच्या स्पाईसजेट विमानाने मदुराई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. हे उड्डाण साधारण दोन तासांचे होते. जेव्हा विमान मीनाक्षी अम्मन मंदिरावरून उडत होते तेव्हा हे जोडपे लग्नाच्या बंधनात अडकले. या अनोख्या विवाहाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.
महत्त्वाचे म्हणजे तामिळनाडूमध्ये कोरोनाची अवस्था फारच बिकट असताना विवाहसोहळ्यात 50हून अधिक लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र 161 पाहुण्यांसह हा विवाहसोहळा विमानात पार पडला. यावेळी कोणीही मास्क घातला नव्हता किंवा सोशल डिस्टन्सिंगचे पालनही झालेले दिसत नाही. परंतु या दाम्पत्याने असा दावा केला आहे की, जितके नातेवाईक आणि पाहुणे या सोहळ्यात सहभागी झाले होते त्या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती आणि त्या सर्वांचा अहवाल हा निगेटिव्ह होता.