#CoronaVirus | महाराष्ट्रातील २०३ विद्यार्थी किर्गिस्तानमध्ये अडकले!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/25.jpg)
रशियामधील किर्गिस्तान येथील ओष विद्यापीठात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील २०३ विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्याची ओढ लागली आहे. आम्हाला लवकरात लवकर मायदेशात आणले जावे, अशी आर्त हाक त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घातली आहे.
किर्गिस्तान सरकारकडून त्यांना मायदेशी पाठविण्याच्या प्रक्रियेतील टप्पे पूर्ण झाले आहेत. मात्र, मुंबई विमानतळावर विमान उतरविण्यासाठीच्या परवानगीसाठी राज्य सरकार व केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या आदेशांची त्यांना प्रतीक्षा आहे. परिणामी परदेशात अडकलेल्या या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचाही जीव टांगणीला लागला आहे. सिन्नरमधील आठ विद्यार्थ्यांसह जिल्ह्यातील ९१, तर राज्यातील २०३ विद्यार्थ्यांचा यात समावेश असल्याची माहिती तेजस वाघ या विद्यार्थ्याचे पालक संजय वाघ यांनी दिली. तेजससोबतच सिन्नरमधील दिलीप बिन्नर यांची कन्या ऋतुजा, डॉ. बी. एम. गडाख यांची कन्या ईश्वरी, स्नेहल रघुनाथ गोळेसर, तेजल सदगीर, संस्कृती तुषार बलक, शुभम नामदेव लोणारे, हर्षद नवनाथ शिंदे हे सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी अडकून पडले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना एका वसतिगृहात ठेवण्यात आलेले आहे.