१० राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ; केंद्राने दिले कडक आदेश
नवी दिल्ली – देशात वारंवार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातच दररोज ४० हजारांहून अधिक नव्या रुग्णांची भर पडतेय. काही राज्यांची परिस्थिती सध्याही प्रचंड चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने १० राज्यांमधील ४६ जिल्ह्यांना कडक कंटेनमेंट झोन जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. या जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी दर हा १० टक्क्यांहून अधिक आहे, म्हणजेच याठिकाणी दर १०० चाचण्यांपैकी १० हून अधिकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळतात. केंद्र सरकारने अशा जिल्ह्यांमधील गर्दी कमी करण्यासाठी कठोर निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत शनिवारी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक झाली. यावेळी केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, ओडिशा, आसाम, मिझोराम, मेघालय, आंध्र प्रदेश आणि मणिपूर या १० राज्यांतील कोरोना परिस्थितीवर विशेष चर्चा झाली. या १० राज्यांमधील ८० टक्के रुग्ण होम क्वारंटाईन असल्याचे कळते. याबाबत केंद्राने चिंता व्यक्त करत राज्य सरकारचे अशा रुग्णांवर लक्ष आहे की नाही, असा सवाल उपस्थित केला. होम क्वारंटाईन असलेले कोरोना रुग्ण घरातून बाहेर पडून कोरोनाचा प्रसार अत्यंत वेगाने करू शकतात. मागील काही आठवड्यांमध्ये केरळ आणि काही उत्तर, पूर्ण राज्यांमधील कोरोनाची दैनंदिन रुग्णवाढ वाढल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे, अशी चिंता केंद्राने व्यक्त केली. तसेच संबंधित राज्यांमधील नागरिकांचे लवकरात लवकर पूर्ण लसीकरण करणे. लसीचा दुसरा डोस देण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.





