“काँग्रेस म्हणजे टायटॅनिकचं जहाज आहे”, भाजपा नेत्याने साधला राहुल गांधी व सोनिया गांधींवर निशाणा
!["Congress is the ship of the Titanic", BJP leader targets Rahul Gandhi and Sonia Gandhi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/WhatsApp-Image-2021-06-16-at-12.56.56-PM.jpeg)
नवी दिल्ली |
काँग्रेस पक्ष हा टायटॅनिकच्या जहाजासारखा असल्याचं म्हणत भाजपा नेते आणि प्रवक्ते गौरव भाटिया यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. त्याचबरोबर गांधी परिवाराच्या नेतृत्वाबद्दलही त्यांनी टीका केली आहे. एका वाहिनीच्या चर्चेमध्ये ते सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. न्यूज १८ इंडिया या वाहिनीच्या चर्चेदरम्यान निवेदकाने त्यांना विचारलं की, आता तुमच्याकडे एक ताजं उदाहरण आहे. मुकूल रॉय जे आजपर्यंत तुमच्यासोबत होते ते आता पुन्हा ममता बॅनर्जींच्या बाजूला गेले आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तेव्हा ते म्हणाले, एखाद्या पक्षाची ओळख म्हणजे त्याची विचारधारा आणि नेतृत्व असतं. भारतीय जनता पार्टीची विचारधारा स्पष्ट आहे आणि आमचं नेतृत्व म्हणजे मोदीजी देशातच नव्हे तर जगभरातलं सर्वात खंबीर नेतृत्व आहे.
ते पुढे म्हणतात, पण दुसऱ्या बाजूला बघितलं तर काँग्रेस पक्ष हा टायटॅनिकच्या जहाजासारखा आहे. तो बुडतच चालला आहे. बुडणार तर आहेच तो कारण राहुल गांधींच्या परिवाराव्यतिरिक्त जर कोणी उठून दिसू लागला तर त्याला दाबून टाकलं जातं, त्याला बाजूला केलं जातं. म्हणून पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह विरुद्ध नवज्योत सिंह सिद्धू, राजस्थानात अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट आणि समाजवादी पार्टी तर एकाच परिवारातल्या सदस्यांनी तयार झालेली आहे. अध्यक्षही त्याच परिवारातला आहे. गौरव भाटिया पुढे म्हणतात, मुकुल रॉय यांच्याबद्दल मी म्हणेन की इथेही फरक आपल्याला दिसून येतो. जेव्हा जितिन प्रसाद काँग्रेस सोडून जातात तेव्हा मध्यप्रदेशातली काँग्रेसची शाखा म्हणते की, तो कचरा होता, कचरापेटीत गेला. पण जेव्हा मुकुल रॉय सोडून गेले, तेव्हा आम्ही अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य केलं नाही.