पश्चिम बंगालमध्ये प्रचारादरम्यान भाजपा खासदारावर हल्ला; सुरक्षा रक्षकांनी रोखली बंदूक
![BJP MP attacked during campaign in West Bengal; Guns stopped by security guards](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/Bjp-mp-dilip-ghosh-attacked-tmc-workers-bhawanipore.jpg)
नवी दिल्ली |
पश्चिम बंगालच्या राजकारणात भवानीपूर पुन्हा एकदा केंद्रस्थानी आहे. भवानीपूर पोटनिवडणुकीत प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. तृणमूल आणि भाजपाने ही जागा जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी येथून निवडणूक लढवत आहेत. भाजपाने प्रियांका तिब्रेवाल यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, प्रचारादरम्यान तृणमूल समर्थकांनी दिलीप घोष यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. दिलीप घोष यांची भवानीपूरमध्ये पदयात्रा सुरू होती त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या दरम्यान भाजपा आणि तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.
भवानीपूर विधानसभा जागेसाठी ३० सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे आणि आज निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. ममता बॅनर्जी भवानीपूर पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार आहेत, तर भाजपाने वकील प्रियांका तिब्रेवाल यांना उमेदवारी दिली आहे. ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी राहण्यासाठी या निवडणुकीत विजय आवश्यक आहे. कारण मे महिन्यात झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालांमध्ये त्यांना नंदीग्राम मतदारसंघातून पराभवाला सामोरे जावे लागले होते.
भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, जडुबाजार भाजपाची एक सभा भाजपाचे खासदार आणि बंगाल भाजपचे उपाध्यक्ष अर्जुन सिंह यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली होती. त्याचवेळी काही तृणमूल कार्यकत्यांनी येऊन बैठकीत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. तृणमूल समर्थकांनी भाजपा कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. यामध्ये भाजप कार्यकर्ता जखमी झाले. त्यांना एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ममता बॅनर्जींवर टीका करताना अर्जुन सिंह म्हणाले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही निवडणुका जिंकण्यासाठी दहशतीचा वापर करावा लागतो.