कोरोनावर केंद्रावर टीका करणाऱ्या ट्विट्सवर कारवाई
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/Btnfm47p_400x400.jpg)
नवी दिल्ली – भारतात कोरोनाने अक्षरश: कहर माजवला असून दररोज तीन लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत, तर हजारोंच्या संख्येने कोरोनाबाधितांचे मृत्यू होत आहेत. त्यातच काही राज्यांत आरोग्य सुविधांसह औषधांच्या तुटवड्यामुळे कोरोनाबाधितांचे हाल होत आहेत. या परिस्थितीवरून केंद्र सरकारवर सोशल मीडियावरून जोरदार टीका होत आहे. मात्र आता सरकारवर टीका करणाऱ्या ट्विटवर कारवाई करण्याचे आदेश केंद्राने ट्विटरला दिले आहेत. त्यानुसार काही अकाऊंटवरील ट्विट्स ब्लॉक करण्यात आले आहेत. यात नेतेमंडळींसह अभिनेत्यांच्या ट्विटचाही समावेश आहे.
खासदार रेवंथ रेड्डी, पश्चिम बंगालचे मंत्री मुलोय घातक, अभिनेता विनीत कुमार सिंह, चित्रपट निर्माते विनोद कापरी आणि अविनाश दास यांच्यासह काही जणांनी कोरोना आणि कुंभमेळ्याबद्दल केलेल्या ट्विटवर कारवाई करण्यात आली आहे. केंद्र सरकारने ट्विटर इंडियाला नोटीस बजावल्यानंतर नमूद करण्यात आलेले ट्विट ब्लॉक करण्यात आले असून, हे ट्विट भारतीय माहिती तंत्रज्ञान कायद्याचा भंग करणारे होते, असे ट्विटरने म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे ट्विटरकडून कारवाई करण्यात आलेले ट्विट्स देशातील करोना औषधी आणि आरोग्य सुविधांची वाणवा याबद्दल भाष्य करणारी होती. औषधींच्या तुटवड्यामुळे रुग्णांना होत असलेल्या त्रासाबद्दलची होती. तर काही ट्विट्स हरिद्वारमधील कुंभमेळ्याबद्दलची होती.
दरम्यान, ट्विटरकडून ट्विट करण्यात आलेल्या अकाऊंटधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे. भारत सरकारने केलेल्या कायद्याचे ट्विटमुळे उल्लंघन होत असल्याचे म्हटले आहे. नोटीसमध्ये माहिती तंत्रज्ञान कायदा-२००० चा उल्लेख करण्यात आला असून त्यानुसार ट्विट्सवर कारवाई करत असल्याचे ट्विटरने म्हटले आहे. मात्र जे ट्विट्स परदेशातून करण्यात आले आहेत, ते अजून दिसत असून, भारतातून करण्यात आलेले ट्विट्स मात्र डिलीट करण्यात आले आहेत.