मौनी अमावस्येला महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी; अमृत स्नान रद्द

MahaKumbh 2025 | संगमनगरी प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये कोट्यवधी साधूसंत आणि सामान्य नागरिकांनी हजेरी लावली आहे. मात्र आता या दरम्यान एक दुःखद घटना घडली आहे.महाकुंभातील दुसऱ्या अमृत स्नान महोत्सवानिमित्त मौनी अमावस्येपूर्वी संगमावर चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत.
आज पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास अमृत स्नानासाठी गंगेच्या विविध घाटांवर जमण्यास सुरुवात केली आणि बॅरिकेट उघडताच इथं जमाव नियंत्रणाबाहेर गेला आणि भयंकर स्वरुपात चेंगराचेंगरी झाली आहे. त्यानंतर अमृत स्नान रद्द करण्यात आले आहे. महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुद्धा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत घटनास्थळाचा आढावा घेतला आहे.
हेही वाचा : राज्यात आर्टिफिशियल इंटेलिजेंस विद्यापीठाची स्थापना होणार; उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील
योगी आदित्यनाथ म्हणाले, संगम घाटावर मोठ्या प्रमाणात भाविक एकत्र आल्याने चेंगराचेंगरी झाली. पण घटनास्थळी प्रशासन सज्ज आहे. रात्री 1 ते 2 वाजताच्या दरम्यान आखाडा मार्गावर अमृत स्नानासाठी भाविक जमले होते. तेथे बॅरिकेट्स लावण्यात आले होते. त्यावेळी बॅरिकेट्स निघाल्याने भाविक गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सातत्याने प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मंगळवारी सायंकाळी 6 वाजल्यापासूनच घाटावर गर्दी वाढत गेली.
संगम घाटातील घटनेनंतर घटनेची माहिती घेण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत चारवेळा फोन केला असून देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे अध्यक्ष जे. पी नड्डा यांनीही संपर्क साधला आहे. तसंच, राज्याचे राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनीही घटनेची माहिती घेतली आहे”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. तसंच, परिस्थितीवर लक्ष ठेवण्याकरता उच्चस्तरीय बैठकही सुरू करण्यात आली आहे. यामध्ये राज्याचे मुख्य सचिव, डीजीपी, मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकाही सामील आहेत, अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली.





