सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांचा 30 टक्के अभ्यासक्रम कमी – रमेश पोखरियाल
![30 percent reduction in CBSE board exams - Ramesh Pokhriyal](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/रमेश-पोखरियाल.jpg)
नवी दिल्ली – जगावर कोसळलेल्या कोरोना संकटामुळे सध्या शाळा, महाविद्यालयांचा अभ्यास ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. अशात परीक्षांबाबत शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मनात अनेक शंका आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि बोर्डाच्या परीक्षांवर केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी आज देशातील विद्यार्थ्यांना संबोधित केले. यावेळी पोखरियाल यांनी ‘सीबीएसईने कोरोनामुळे बोर्डाच्या परीक्षांचा 30 टक्के अभ्यासक्रम कमी केला असून बोर्डाने गुणपत्रिकेवरून ‘नापास’ हा शब्दही हटवला आहे’, अशी माहिती दिली. त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने शाळेतील विद्यार्थ्यांचा अभ्यास अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच भारताच्या नव्या शिक्षण पद्धतीचे जगभरातून कौतुक केलं जात आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, कोरोना संकटात बोर्डाच्या परीक्षा कशा घेतल्या जाणार, कधी घेतल्या जाणार, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहे. यावर आज केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत सर्व शंकांचे निरसन केले. यावेळी त्यांनी सर्व शाळांच्या मुख्यध्यापकांना आवाहन केले की, अभ्यासक्रमातील कोणते धडे हटवले आहेत, यासंदर्भात आपल्या शाळेतील शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना माहिती द्या. याबाबत कोणतीही शंका ठेवू नका. तसेच ‘परीक्षांच्या तारखा आधीच जाहीर केल्या जातील. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात येईल’, असेही त्यांनी सांगितले.
महत्त्वाचे म्हणजे बोर्डाच्या परीक्षांच्या तयारीसाठी जर शाळा सुरू करण्यात आल्या तर सुरेक्षेसाठीच्या उपाययोजनांवरही पोखरियाल यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, ‘मास्कचा वापर करा. सोशल डिस्टन्सिंग पाळा. सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन करा. नीट परीक्षा यासंदर्भातील सर्वात मोठे उदाहरण आहे.’ त्याचबरोबर ‘शाळा सुरू करण्याचा निर्णय आम्ही त्या-त्या राज्यांवर सोपवला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये 17 राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यात आल्या आहेत’, असेही ते म्हणाले.