सांगलीत कोरोनाची स्थिती चिंताजनक; जनता कर्फ्यू जाहीर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/9BMPUNE.jpg)
सांगली शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग चिंताजनक स्थितीत आहे. वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या तुलनेत पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने परिस्थिती आणखी बिकट बनत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने सांगली, मिरज आणि कुपवाड क्षेत्रातील आठवडा बाजार बंद करण्यात आला आहे.
सांगलीतील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने सांगली, मिरज आणि कुपवाड क्षेत्रातील आठवडा बाजार बंद करण्यात आला आहे. फेरीवाल्यांनाही एकाच ठिकाणी थांबून वस्तूंची विक्री करण्यास बंदी घातली आहे. सोमवारपासून याची अंमलबजावणी सुरू झाली. आठवडा बाजार भरल्यास किंवा रस्त्यावर बसून विक्री करताना आढळल्यास विक्रेत्यांच्या सर्व वस्तू जप्त करून गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला.
सांगली शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग चिंताजनक स्थितीत आहे. वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या तुलनेत पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने परिस्थिती आणखी बिकट बनत आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनीच खबरदारी घेण्याची वेळ आली आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी आरोग्य यंत्रणांच्या मर्यादा स्पष्ट करून नागरिकांना स्वतःहून खबरदारी घेण्याचे आवाहन केले होते. यानुसारच ११ सप्टेंबरपासून जिल्ह्यात जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला. मात्र, नागरिकांनीच रस्त्यांवर गर्दी करीत जनता कर्फ्यूला हरताळ फासला. यातून संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने संसर्ग वाढत आहे.
वाढता संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. शहरातील सर्व आठवडी बाजार, भाजी मंडई, एकाच ठिकाणी थांबून वस्तूंची विक्री करणारे फेरीवाले, खाऊ गल्ली बंद ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. सोमवारपासून याची अंमलबजावणी सुरू झाली. या निर्णयामुळे गर्दीची ठिकाणे निर्मनुष्य बनली आहेत. फळे, भाजीपाला यासह अत्यावश्यक वस्तू वाहनांमधून फिरून विक्री करण्याची मुभा आयुक्तांनी दिली आहे. मात्र, बाजार भरवल्यास किंवा रस्त्याकडेला थांबून विक्री सुरू ठेवल्यास वस्तू जप्त करण्यासह गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. कारवाईसाठी महापालिकेने पथके तैनात केली आहेत.
शहरासह जिल्ह्यातील गर्दी टाळण्यासाठी पोलिस बळाचा वापर करण्याच्या सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या आहेत. यानुसार विनाकारण घराबाहेर पडणा-या नागरिकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाया केल्या जात आहेत. विनामास्क बाहेर पडणा-या दोनशेहून अधिक लोकांकडून एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय वाहनधारकांवर कारवाया केल्या जात आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडून संसर्ग आणि दंडात्मक कारवाईचा धोका पत्करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.