राजू शेट्टींनी घरासमोरच पेटवली कृषी विधेयकांची होळी
राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. या अंतर्गत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी सकाळी त्यांच्या घरासमोर कृषी विधेयकाची होळी केली. तसेच सरकारने हे विधेयक मागे घ्यावे, अशी मागणी यावेळी केली.
राज्यसभेमध्ये कृषी विषयक दोन विधेयक मंजूर करण्यात आलं . या विधेयकामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे असे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे. या विधेयकाला विरोध करण्यासाठी देशभरातील सर्व संघटनांना एकत्रित करून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय येथे आज विधेयकाची होळी करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.
स्वतः शेट्टी यांनी आज अर्जुनवाड (तालुका शिरोळ) येथील आपल्या घरासमोर विधेयकाच्या प्रतीची होळी केली. ‘कृषी विधेयक मागे घ्या’, ‘केंद्र शासनाने केंद्र शासनाचा अधिकार असो’ अशा घोषणा त्यांनी दिल्या. शेट्टी हे नुकतेच करोनामुक्त झाले असल्याने त्यांनी बाहेर जाण्याचे टाळून घरासमोरच होळी करत केंद्र शासनाच्या विरोधातील संताप व्यक्त केला.
मोदी सरकारच्या या विधेयकामुळे शेतकऱ्याचे आर्थिक कंबरडे मोडणार जाणार आहे. केंद्र शासनाला शेतकऱ्यांचे हित साधायचे असेल तर आधी कृषी उत्पादनांना हमीभावाची खात्री द्यावी. त्या संदर्भातील कायदा मंजूर करावा असे विधेयक मी 2008 साली संसदेमध्ये मांडले होते. ते मंजूर केले तरच शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, अन्यथा शेतकरी हिताच्या नावावर कार्पोरेट कंपन्यांचे भले होणार आहे,अशी टीका करत त्यांनी या विधेयकाच्या विरोधात स्वाभिमानीचे आंदोलन यापुढेही सुरू राहिल, असा इशारा त्यांनी दिला.