मन की बात: नरेंद्र मोदी आज काय बोलणार?; देशवासीयांचं लागलं लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासीयांना संबोधित करणार आहे. देशात करोनामुळे अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउनचा निर्णय घेतला. दोन महिन्यांपासून देश लॉकडाउनमध्ये आहे. आजच्या मन की बात कार्यक्रमातून नरेंद्र मोदी लॉकडाउन वाढवण्याची घोषणा करतील, असं बोललं जात होतं. त्यापूर्वीच शनिवारी (३० मे) केंद्रानं पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊनची नियमावली जारी केली. त्यामुळे आज मोदी कोणत्या विषयावर बोलणार याकडे, देशवासीयांचं लक्ष लागलं आहे.
पंतप्रधान प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी देशातील नागरिकांशी ‘मन की बात’ करतात. देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारनं देशातील लॉकडाउन शिथिल करण्याच्या दिशेनं पावलं टाकली आहेत. धार्मिक स्थळांसह देशातील अनेक सेवा सुरू करण्यास केंद्रानं अटींसह परवानगी दिली आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्याची चिन्ह आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी आजच्या मन की बात कार्यक्रमासंदर्भात काही सूचना आणि विषय लोकांकडून मागितले होते. त्यातील कोणत्या विषयावर मोदी मार्गदर्शन करणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
करोना आणि लॉकडाउनमुळे अर्थचक्र रुतून बसलं होतं. त्यातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारनं २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. त्यातील विविध घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्या आहेत. ‘आत्मनिर्भर भारत अभियानाची’ घोषणा करत केंद्रानं हे पॅकेज जाहीर केलं होतं. त्याविषयीही मोदी भाष्य करू शकतात. त्याचबरोबर लॉकडाउन शिथिल करण्यास सुरूवात झाली असली, तरी नव्या लॉकडाउनबद्दल मोदी देशवासीयांशी बोलू शकतात. तसेच आरोग्याची काळजी घेऊन कोणत्या गोष्टींचं सहकार्य सरकारला करावं, याबाबतही ते भाष्य करण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मोदी यांनी आईला लिहिलेल्या पत्रांचं पुस्तक अलिकडेच प्रकाशित झालं आहे. त्याबाबतही ते भाष्य करण्याची शक्यता आहे.





