भारतात २०२१ आधी कोरोना लस येणे शक्य नाही! विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा दावा
![2,95,041 new positive patients in 24 hours in the country; 2,023 deaths](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/India_Corona.jpg)
नवी दिल्ली | भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) १५ ऑगस्टपर्यंत कोरोना लस बाजारात उपलब्ध होईल, असा दावा केला आहे. मात्र विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कोरोना लस बाजारात उपलब्ध होण्यासाठी २०२१ उजाडेल, भारतात २०२१ आधी कोरोना लस येणे शक्य नाही, असा उलट दावा केला आहे.
‘कोरोनावर जगभरात आतापर्यंत १४० लस तयार करण्यात आल्या आहेत. यापैकी ११ लस मानवी चाचणीसाठी तयार आहेत. विशेष म्हणजे या ११ पैकी २ लस या भारतात तयार झाल्या आहेत. मात्र तरीही या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोना लस बाजारात उपलब्ध होणे कठीण आहे’, असे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. ‘भारतात जवळपास सहा कंपन्या कोरोनावर लस तयार करण्यासाठी काम करत आहेत. देशात २ लस तयार झाल्या आहेत. यापैकी एक आयसीएमआर आणि भारत बायोटेक कंपनी यांच्या संयुक्त प्रयत्नाने तयार करण्यात आली आहे. या लसीचे नाव ‘कोवॅक्सिन’ असे आहे. या लसीला मानवी चाचणीसाठी परवानगीदेखील मिळाली आहे. तसेच ‘जायडस कॅडिला’ कंपनीनेदेखील लस तयार केली आहे’, अशी माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने दिली.