बिहार विधानसभा निवडणुकीचे जागा वाटप जाहीर
पाटणा – बिहार विधानसभा निवडणुक जाहीर झाल्यानंतर लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचे जागा वाटपही पूर्ण झाले आहे. काँग्रेसच्या वाट्याला ७० जागा आल्या आहेत. तर आघाडीच्या जागा वाटपात सीपीआयला ६, सीपीआय (एमएल)ला १९, सीपीएमला ४ जागा देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय राजदच्या वाट्याला आलेल्या जागांमधून जेएमएम आणि व्हीआयपी या पक्षांना जागा सोडण्यात येणार आहेत. दरम्यान, यावेळी राजद नेते तेजस्वी यादव यांच्या नावावरच आघाडीचे नेते म्हणून शिक्कामोर्तबही करण्यात आले आहे. तर, दुसरीकडे भाजप आघाडीतील जागा वाटपाचा पेच अद्यापही कायम आहे.
काल (३ ऑक्टोबर) झालेल्या जागा वाटपानंतर तेजस्वी यादव यांची आघाडीचे नेते म्हणून निवड करण्यात आली असून त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. राजद नेते लालूप्रसाद यादव हे तुरुंगात असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढली जाणारी बिहार विधानसभेची ही पहिलीच निवडणूक आहे.
काल जागा वाटपानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या निवड समितीचे अध्यक्ष अविनाश पांडे यांनी महाआघाडीत वैचारिक मतभेद असल्याचं मान्य केलं. मात्र, बिहारच्या हितासाठी आम्ही एकत्रित आलो असल्याचं सांगितलं. २०१५ मध्ये बिहारमध्ये महाआघाडीलाच बहुमत मिळालं होतं. पण दुर्देवाने या बहुमताचं अपहरण करण्यात आलं. नितीश कुमार यांनी सवतासुभा रचत भाजपशी घरोबा केला. त्याचा बदला या निवडणुकीत जनता घेतल्या शिवाय राहणार नसल्याचंही त्यांनी सांगितले आहे.





