बरे झालेल्या रुग्णांपैकी निम्मे रुग्ण एकाच आठवड्याच्या कालावधीतील – आरोग्यमंत्री राजेश टोपे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/rajesh-tope.jpg)
मुंबई | कोरोनाचे रूग्ण बरे होण्याची संख्या दिवसागणिक वाढत आहे. राज्यात बरे झालेल्या एकूण रुग्णांच्या निम्मे रुग्ण या एका आठवड्यात बरे झाले आहेत. आज आतापर्यंत सर्वाधिक ६०० हून अधिक रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या सुमारे ७६८८ एवढी आहे. विशेष म्हणजे बरे होणारे सर्वाधिक रुग्ण हे मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव या भागातील आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
केंद्र शासनाने सुमारे एक आठवड्यापूर्वी कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबत सुधारित धोरण जाहिर केले होते. त्यानुसार कुठलीही लक्षणे नसलेल्या रुग्णांना १४ दिवसांऐवजी दहाव्या दिवशी घरी सोडण्यात येत आहे. यामुळे बरे झालेल्या रूग्णांची संख्या देखील वाढली आहे. गेल्या रविवारी म्हणजे १० मे रोजी ३९९ रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर ११ मे रोजी ५८७, १२ मे रोजी ३३९, १३ मे रोजी ४२२, १४ मे रोजी ५१२, १५ मे रोजी ५०५, १६ मे रोजी ५२४ आणि आज १७ मे रोजी ६०० हून अधिक रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. अशा प्रकारे या एका आठवड्यामध्ये ३७०० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत ७६८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत त्यातील ५० टक्के रूग्ण हे १० ते १७ मे या कालावधीतील आहेत. साधारणत: मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून बरे झालेल्या कोरोनाबाधीत रुग्णांना घरी सोडले जात आहे. मार्चमध्ये दोन अंकी असलेली ही संख्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून तीन अंकी झाली.