काळे कायदे मागे घ्या, अन्यथा खेलरत्न पुरस्कार परत देईन- विजेंदर सिंह
![Take back the black laws, otherwise I will return the Khel Ratna award - Vijender Singh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/vijendar-singh-KHELRATN-PURASKAR.png)
नवी दिल्ली – केंद्र सरकारने बनवलेल्या कायद्याला शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होत आहे. हे कायदे मागे घ्यावेत याकरता गेल्या १० दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसून आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असले तरीही शेतकऱ्यांना बाहेरून प्रचंड पाठिंबा मिळत आहे. कलाक्षेत्रातील कलाकार मंडळी शेतकऱ्यांसाठी पुढे आलीत त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रातील खेळाडूही पुढे येत आहेत. भारतीचा बॉक्सर विजेंदर सिंहनेही शेतकरी आंदोलनाला आपला पाठींबा दर्शवत…काळे कायदे मागे न घेतल्यास आपला खेलरत्न पुरस्कार परत देण्याची घोषणा केली आहे.
३५ वर्षीय विजेंदरने शेतकरी आंदोलनस्थळाला भेट देऊन आपला पाठींबा जाहीर केला. विजेंदरला देशातला सर्वोच्च क्रीडा पुरस्कार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. “मी पंजाबचं खूप काही देणं लागतो. बॉक्सिंग खेळत असताना मी बराच कालावधी पंजाबमध्ये घालवला आहे. त्यामुळे या निमित्ताने पंजाबला आणि शेतकऱ्यांना पाठींबा देऊन मी ऋण फेडण्याचा प्रयत्न करतोय. शेतकऱ्यांच्या मागण्यांना माझा पूर्ण पाठींबा आहे. संपूर्ण देशाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं रहायला हवं कारण ते देशाची लाईफलाईन आहेत.”
आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं प्रतिनिधीत्व करताना मी जे यश मिळवलं त्यासाठी मला खेलरत्न पुरस्कार मिळाला. पण सरकार ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना वागवत आहे ते पाहता निषेध म्हणून मी माझा पुरस्कार आणि त्यानिमीत्ताने मिळणारे सर्व लाभ परत करेन. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करावा अशी माझी विनंती आहे. सर्व खेळाडूंनीही शेतकऱ्यांच्या या मागणीला पाठींबा दर्शवावा अशी मागणी विजेंदरने केली.