काँग्रेसने ४३ हजार किमीचा भारताचा भाग चीनला सरेंडर केला – जे.पी नड्डा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/JP-Nadda-1.jpg)
नवी दिल्ली | भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ‘काँग्रेसने सैन्याचा अपमान करणे थांबवले पाहिजे आणि राष्ट्रीय ऐक्याचा खरा अर्थ समजून घ्यावा. सर्जिकल आणि एअर स्ट्राईकच्या बाबतीत काँग्रेसने हेच केले होते. सैन्याचा सन्मान करा, अजूनही उशीर झालेला नाही.’
जे.पी नड्डा म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींवर १३० कोटी भारतीयांचा विश्वास आहे. २०१० आणि २०१३ दरम्यान एलएसीमध्ये ६०० वेळा घुसखोरी झाली. काँग्रेस चीनला शरण गेले. ते म्हणाले, काँग्रेसनं ४३००० किलोमीटरचा भारतीय भाग चीनला सरेंडर केला.’ ‘माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे विधान केवळ शब्द खेळ आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावर कोणत्याही भारतीयांचा विश्वास बसणार नाही. याच काँग्रेसने आपल्या सशस्त्र दलाचे मानसिक खच्चीकरण केले आहे. पंतप्रधान मोदींवर भारताचा पूर्ण विश्वास आहे. १३० कोटी भारतीयांनी कठीण परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व पाहिले आहे. त्यांनी देशाला नेहमीच वर ठेवले आहे.
‘डॉ. मनमोहन सिंग विविध विषयांवर आपली मतं निश्चितपणे मांडू शकतात. पण पीएमओची जबाबादारी त्यांची नाही. यूपीएच्या सिस्टमचं कार्यालय बंद झालं आहे. जेथे जवानांचा अपमान केला जात होता.’ भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांचे हे वक्तव्य माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भारत-चीन संघर्षावरील विधानानंतर आले आहे.