उद्यापासून धावणार २०० विशेष ट्रेन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Train-3-1.jpg)
नवी दिल्ली | उद्यापासून, अर्थात १ जून २०२० पासून रेल्वे २०० विशेष गाड्या सुरू करत आहे. अनलॉक -१ च्या दिशेने जाण्याच्या दृष्टीने ही एक अतिशय महत्त्वाची पायरी मानली जात आहे. या ट्रेन श्रमिक विशेष ट्रेनपेक्षा वेगळ्या असतील. या ट्रेनची तिकिटे भारतीय रेल्वे केटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनची (आयआरसीटीसी) वेबसाइट, मोबाइल अॅप तसेच आरक्षण काऊंटर आणि तिकिट एजंटांकडून मिळू शकणार आहेत. या ट्रेन पूर्णपणे आरक्षित आहेत. यांमध्ये एसी, नॉन एसी असे दोन प्रकारचे डबे असतील. त्याचबरोबर जनरल कोचमध्ये बसण्यासाठी जागा असतील. या ट्रेनमध्ये आरक्षण ३० दिवसांऐवजी १२० दिवस अगोदर केले जाऊ शकेल. प्रवासादरम्यान, आपल्याला गंतव्य शहराचा पत्ता द्यावा लागणार आहे.
काही अडचण आल्यास १३९ आणि १३८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येईल. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गेल्या शुक्रवारी गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना, गरोदर स्त्रिया आणि ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना आवश्यक असतानाच ट्रेनने प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. रेल्वे मंत्रालयानेही एका निवेदनाद्वारे लोकांना गरज असेल तरच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.