शाळांमध्ये मोठय़ा संख्येने विद्यार्थी गैरहजर
४८ टक्के पालकांची संमती असूनही केवळ ३४ टक्के उपस्थिती
मुंबई | करोनाच्या तिसऱ्या लाटेचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतर २४ जानेवारीपासून मुंबईतील विविध माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या असल्या तरी अजूनही पालकांकडून पुरेसा प्रतिसाद मिळालेला नाही. मुंबईतील पालिकेच्या, खासगी व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचा विचार करता केवळ ४८ टक्के पालकांनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे संमतिपत्र दिले असून प्रत्यक्षात ३४ टक्के विद्यार्थीच शाळेत उपस्थित राहत असल्याचे आढळून आले आहे.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ापासून मुंबईतील करोना रुग्णांची संख्या वाढू लागली होती. तसेच ओमायक्रॉन या नव्या विषाणू प्रकाराचेही रुग्ण वाढू लागले होते. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंध घातले होते. मात्र मुंबईतील रुग्णसंख्या जानेवारीच्या दुसऱ्या आठवडय़ानंतर वेगाने ओसरू लागल्यानंतर २४ जानेवारीपासून पुन्हा एकदा शाळा सुरू करण्यात आल्या. पालकांकडून संमतिपत्र घेऊनच मुलांना शाळेत प्रवेश दिला जात आहे. तसेच जे पालक पाल्यांना प्रत्यक्ष शाळेत पाठवत नाहीत त्यांच्याकरिता दृक-श्राव्य माध्यमातून शाळा सुरू ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मुंबईतील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील एकूण विद्यार्थ्यांची संख्या साडेसहा लाख असून त्यापैकी तीन लाख १६ हजार ८५३ पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास संमतिपत्र दिले, तर त्यापैकी केवळ दोन लाख २४ हजार ७५९ विद्यार्थी शाळेत येत असून तब्बल चार लाख २७ हजार ७५१ विद्यार्थी गैरहजर आहेत.