‘कोल्हापूरची बदनामी खपवून घेणार नाही’; सतेज पाटलांचा चित्रा वाघ यांंना इशारा
कोल्हापूर |
कोल्हापूर जिल्हा महिलांसाठी असुरक्षित असल्याचा भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचा आरोपी हा कोल्हापूरची बदनामी करणारा आहे, ही बदनामी संयुक्तिक नसल्याने आम्ही ती खपवून घेणार नाही, असा इशारा गृहराज्यमंत्री व पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिला.
चित्रा वाघ यांची कोल्हापुरात प्रचार सभा सुरु असताना दगडफेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर वाघ यांनी कोल्हापुरात महिला असुरक्षित असल्याचे विधान केले होते. गृहराज्यमंत्री पाटील यांच्या यांच्यावरही त्यांनी आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री पाटील यांनी सांगितले की, कोल्हापूर उत्तर मतदारसंघात पराभव दिसत असल्याने सध्या चुकीचे आरोप करत निवडणूक वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. काल जी घटना घडली त्याची सखोल चौकशी करावी अशा सूचना आपण पोलिस खात्याला दिले आहेत. शिवाय प्रचाराला जे भाजपचे नेते येतील त्यांना दुप्पट सुरक्षा देण्याची विनंतीही केली आहे.
कालची घटना मॅनेज असल्याचा आरोप करत पाटील म्हणाले, हा भाजपचा डाव आहे. पायाखालची वाळू घसरू लागल्यामुळे या पद्धतीने खोटे आरोप करून कोल्हापूरची बदनामी केली जात आहे. दगडफेकीनंतर ते आरोपी पंपावर गेले की कदमवाडीत याचा तपास करावा अशी मागणी करुन पाटील म्हणाले, भाजपने दिल्लीत महाराष्ट्राची बदनामी केली ,आता महाराष्ट्रात कोल्हापूरची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, यामुळे भविष्यकाळात या शहराच्या प्रगतीला खो बसणार आहे. अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिलांना असुरक्षित वाटावं असं वातावरण निर्माण केले जात आहे. कोल्हापुरात ऑनलाईन पैसे वाटले जात असल्याची शक्यता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली होती. याबाबत बोलताना गृह राज्यमंत्री पाटील यांनी हा कोल्हापूरकरांचा अपमान असल्याचा प्रतिटोला मारला.