‘राजकारणासाठी व्यक्तिगत नाते तोडू नये’; जयंत पाटलांचा अजितदादांना टोला
मुंबई | अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर पवार कुटुंबात कटुता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी देशमुख काका पुतण्याचा विशेष नामोल्लेख करत पवार काका पुतण्यामध्ये पडलेल्या संघर्षाच्या ठिणगीवरून खंत व्यक्त केली. महाराष्ट्राला काका पुतण्याच्या संघर्षाचा फार मोठा इतिहास आहे. परंतु काँग्रेसला काका पुतण्याचं नातं धार्जिणं आहे हे दिलीपराव देशमुख आणि अमित देशमुख यांच्याकडे पाहिल्यावर कळतं, असं ते म्हणाले.
जयंत पाटील म्हणाले की, एखाद्यावर संताप व्यक्त करण्यासाठी खालच्या दर्जाला राजकारण गेलं आहे. त्यामुळे आता कुठेतरी थांबलेलं बरं असं अनेकांना वाटतं. किती गुंडगिरी महाराष्ट्रातील राजकारणात शिरते आहे, याची अनेक उदाहारणं गेल्या काही महिन्यांत दिसायला लागली आहेत. माझी लातूरकरांना विनंती आहे की, या लातूरने महाराष्ट्रातील काँग्रेसला सतत तेज देण्याचं काम केलं आहे. काँग्रेस महाराष्ट्रात ठामपणे अस्तित्वात आहे, हे अनेकवेळा या लातूरने सिद्ध करून दाखवलं आहे. लातूरकरांवर ही जबाबदारी आहे की आपल्या महाराष्ट्रात ज्या संस्कृतीत वाढलो, जी संस्कृती विलास देशमुखांनी दाखवली, ती संस्कृती लोप पावत आहे. या लोप पावणाऱ्या या संस्कृतीला टिकवण्याचं काम लातूरकरांचं आहे.
हेही वाचा – ‘..म्हणून केंद्र सरकारने कांद्यावरची निर्यात बंदी उठवली’, रोहित पवारांची टीका!
काँग्रेसचं बरं आहे काका-पुतण्याचं नातं धार्जिणं दिसत आहे. दिलीप देशमुख उत्तमपणाने नेतृत्त्व करत आहेत. अमित यांच्यासह सर्वांचे संबंध मधूर आहेत. राजकारणात कसंही कोणी वागलं तरी चालतं. पण राजकारणासाठी व्यक्तिगत नातं तोडण्याची भूमिका कोणी घेता कामा नये. आता त्याही गोष्टी व्हायला लागल्या आहेत, असा टोला लगावला. काँग्रेसमधील दिलीप देशमुखांच्या मागे सक्षम आणि खंबीरपणाने राहणारा नेता अमित देशमुखांच्या रुपाने भेटला आहे. पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्या पीढीच्या नंतरची पिढी म्हणून सतेज पाटील आहेत, असं जयंत पाटील म्हणाले.
आज विलासराव देशमुख असते तर काँग्रेस अधिक संपन्न आणि सामर्थ्यवान झाली असती. विलासरावांनी सक्षम आणि भक्कम काँग्रेस महाराष्ट्रात उभी होती. काँग्रेस विलासरावांच्या नेतृत्त्वामुळेच होती. विलासराव देशमुखांना महाराष्ट्रातील खडान् खडा माहिती होती. लोक एखाद्या व्यक्तीला त्यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे स्मरणात ठेवतात. विलासराव देशमुख साहेब यांनी मराठवाड्यासाठी आणि संपूर्ण राज्यासाठी विस्तृत काम केले आहे. आटपाडीच्या साखर कारखान्याच्या उद्घाटनप्रसंगी ते आले होते. तेव्हा त्यांचे भाषण पहिल्यांदा ऐकलं. राजकारण्याने कसे भाषण करावे हे विलासरावांकडून शिकले पाहिजे. मी त्यांच्या मंत्रिमंडळात अधिकतम काम केले आहे. त्यामुळे त्यांचे आणि माझे घनिष्ट ऋणानुबंध होते. त्याकाळी फार वेगळे राजकीय संस्कार आम्ही अनुभवले. म्हणून महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेऊ शकलो. आज स्व. विलासराव देशमुख साहेब असते तर काँग्रेसच्या संकटाच्या काळात उभे ठाकले असते. आज राज्यातील काँग्रेस भक्कम पाय रोवून उभी आहे ती विलासराव देशमुख साहेबांमुळे, असंही जयंत पाटील म्हणाले.