जागतिक शांतता निर्देशांकात भारत १६३ देशांच्या यादीत १३५ व्या क्रमांकावर!
पुणे : भारतात सातत्यानं घडणाऱ्या हिंसक घटनांमुळे देशाचं मोठं आर्थिक नुकसान होताना दिसतं आहे. सीएए, (CAA)एनआरसी, कृषी कायद्यांविरोधात आंदोलनानंतर भारतीय लष्करासाठी लागू केलेली अग्निपथ योजना. सोबत मोहम्मद पैगंबर यांच्यावरील टिप्पणीमुळं सुरु झालेला वाद. यामुळं देशभरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडून आलाय. याचा फटका भारताच्या प्रतिमेला ही बसताना दिसतोय. जागतिक शांतता निर्देशांकात भारत १६३ देशांच्या यादीत १३५ व्या क्रमांकावर फेकला गेला आहे.
तर दुसऱ्या बाजूला भारताचा सर्वात अस्थिर आणि हिंसक घडामोडींसाठी प्रसिद्ध असलेला पाकिस्तान ५४ व्या क्रमांकावर आहे तर चीन १३८ व्या क्रमांकावर आहे. या हिंसक आंदोलनामुळं भारताकडे पहायची उद्योगांची नजर गढूळ होऊ शकते. कारण या हिंसक आंदोलनांमुळं भारताचं ६४६ अब्ज डॉलर्सचं नुकसान झालंय. त्याचा थेट परिणाम देशाच्या बजेटवरही होतोय. आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी निधी खर्च होतोय. त्याचा फटका विविध कल्याणकारी योजनांना थेट बसताना दिसतो आहे. हिंसाचाराची आग येत्या काही दिवसात विझली नाही तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.
कोरोनानंतर अनेक बड्या देशांचं आर्थिक कंबरड मोडलं. यामुळं मोठं नुकसानही झालं. या देशांना अजूनही यातून बाहेर पडता आलं नाही. तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था पाय रोवून उभी राहिली. कोरोनाचे आरोग्य आणि आर्थिक परिणाम भोगूनही ही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे. मात्र दुसरं जळजळीत सत्य संतापजनक आहे. भारतीय एकूण सकल उत्पन्न ज्याला आपण जीडीपी म्हणतो. त्याची सहा टक्के रक्कम हिंसाचारात भस्मसात झालीये. ही मोठी धक्कादायक गोष्ट आहे. भारतासारख्या विकसनशील देशाला याची मोठी किंमत नजिकच्या काळात मोजावी लागू शकते. शिक्षण आणि रोजगारातील अभाव स्पष्टपणे दिसून येतायेत. त्यामुळं आंतरराष्ट्रीय विद्यापीठांपासून कंपन्या भारतात येण्यासाठी उत्सुक आहे. मात्र भारतात वारंवार डोकं वर काढणारा हा हिंसाचार नव्या संधींची माती करु शकतो. याचा विचार होणं गरजेचं आहे. गेल्या काही वर्षांत देशात अनेक मुद्द्यांवरून हिंसक निदर्शने झालीयेत. त्यामुळं कर्फ्यू, इंटरनेट बंदी अशी कडक पावलंही उचलण्यात आलीयेत. याशिवाय दहशतवादी आणि नक्षलवादी हल्ल्यांमुळंही देशाला मोठा फटका बसला आहे. या घटनांमध्ये जीवित आणि मालमत्तेच्या हानीबरोबरच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या देशाचेही नुकसान झाले आहे.
जागतिक शांतता निर्देशांकात आइसलँड अव्वल, तर अफगाणिस्तान तळाशी
२०२२ च्या अहवालानुसार, आइसलँड हा जगातील सर्वात शांत देश ठरला आहे. न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर तर आयर्लंड तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तान सर्वाधिक अशांत देशांच्या यादीत अग्रस्थानी आहे. १६३ देशांच्या या निर्देशांकात अफगाणिस्तानलाही शेवटचे स्थान मिळाले आहे. त्यावर येमेन आणि सीरियाचा नंबर लागतो. हे तिन्ही देश दहशतवाद आणि गृहयुद्धाचा गंभीरपणे सामना करत आहेत.
हिंसाचाराने प्रभावित देशांच्या संख्येत वाढ
ग्लोबल पीस इंडेक्स २०२२ च्या अहवालानुसार, हिंसक अंतर्गत संघर्षाचा सामना करणार्या देशांची संख्या २९ वरून ३८ पर्यंत वाढली आहे, परंतु २०१७ पासून अंतर्गत संघर्षात मारल्या गेलेल्या लोकांची संख्या कमी झाली आहे. आफ्रिकेनंतर दक्षिण आशिया हा जगातील दुसरा सर्वाधिक अशांत प्रदेश आहे. सीरिया, दक्षिण सुदान आणि मध्य आफ्रिकन रिपब्लिकमध्ये हिंसाचारामुळे सर्वाधिक आर्थिक नुकसान झाले आहे. तर आइसलँड, कोसोवो आणि स्वित्झर्लंड हे देश सर्वात कमी प्रभावित झाले आहेत.