breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

#INDvsENG टी-20 मालिकेत भारताचा इंग्लंडवर 3-2ने दणदणीत विजय

अहमदाबाद – अतिशय रंगतदार झालेल्या पाचव्या टी-20 सामन्यात इंग्लंडला 36 धावांनी मात देत भारताने पाच सामन्यांची मालिका 3-2 अशी खिशात घातली. इंग्लंडचा कर्णधार ईऑन मॉर्गन याने शनिवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या पाचव्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. त्यानुसार प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारताने इंग्लंडसमोर 224 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी केलेल्या दमदार प्रदर्शनामुळे इंग्लंडला निर्धारित 20 षटकात 8 बाद 188 धावांपर्यंतच पोहोचता आले. यावेळी भुवनेश्वर कुमारला सामनावीर आणि विराट कोहलीला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 बाद 224 धावा केल्या. टी-20 क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्धची ही भारताची सर्वोत्तम धावसंख्या ठरली. या सामन्यात प्रथमच सलामी देण्यासाठी कर्णधार विराट आणि उपकर्णधार रोहित मैदानात उतरले. तर आदिल रशीदने इंग्लंडकडून पहिले षटक टाकले. या षटकात रशीदने तीनच धावा दिल्या. पुढच्या षटकात भारताच्या सलामीवीरांनी आर्चरला दोन चौकार पटकावले. पाच षटकात या दोघांनी फलकावर 44 धावा लावल्या. पुढच्या षटकात मार्क वूडला षटकार ठोकत विराटने संघाचे अर्धशतक पूर्ण केले. यानंतर रोहितने आक्रमक फटकेबाजी करत संघाची धावगती वाढवली. आठव्या षटकात सॅम करनला अप्रतिम षटकार ठोकत रोहितने अर्धशतक पूर्ण केले. अवघ्या 30 चेंडूत रोहितने आपले अर्धशतक साकारले. मात्र रोहित मोठी खेळी करणार असे वाटत असताना बेन स्टोक्सने त्याला बाद केले. रोहितने 34 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकार ठोकत 64 धावा केल्या. विराट-रोहितने 94 धावांची यशस्वी सलामी दिली. या मालिकेतील ही भारताची सर्वोत्तम सलामी होती. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या सूर्यकुमार यादवने रशीदला षटकार ठोकत दहाव्या षटकात भारताचे शतक फलकावर लावले. सूर्यकुमारने मागील सामन्यातील फॉर्म कायम राखत इंग्लंडवर आक्रमण केले. इंंग्लंडच्या बाराव्या षटकात विराट-सूर्यकुमारने ख्रिस जॉर्डनला चार चौकार खेचले. परंतु अर्धशतकाकडे वाटचाल करणाऱ्या सूर्यकुमारला आदिल रशीदने बाद केले. मोठा फटका खेळलेल्या सूर्यकुमारचा ख्रिस जॉर्डनने सीमारेषेवर सुरेख झेल घेतला. त्याने 17 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 32 धावा केल्या. त्यानंतर पंधराव्या षटकात हार्दिक पंड्या आणि विराट कोहलीने संघाचे दीडशतक पूर्ण केले. सलामीला आलेल्या विराटने 16व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. शेवटच्या षटकापर्यंत या दोघांनी हाणामारी सुरूच ठेवली. 18व्या षटकात भारताने दोनशे धावांचा टप्पा ओलांडला. इंग्लंडकडून आदिल रशीद आणि बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

भारताच्या 225 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. भुवनेश्वर कुमारच्या पहिल्या षटकात जेसन रॉय बाद झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर डेव्हिड मलान फलंदाजीला आला. त्याने हार्दिक पंड्याच्या पहिल्याच षटकात फटकेबाजीला सुरुवात केली. पंड्याला पहिल्याच षटकात 18 धावा मोजाव्या लागल्या. पहिल्या विकेटनंतर कोणताही दबाव न घेता जोस बटलर आणि डेव्हिड मलानने भारताच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. इंग्लंडने चार षटकात 41 धावा जोडल्या. तर पाचव्या षटकात इंग्लंडने आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताचे फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर आणि राहुल चहर यांच्या षटकातही बटलरने खूप धावा वसूल केल्या. त्यानंतर मोठे फटके आणि दुहेरी धावा करत या दोघांनी दहाव्या षटकात संघाचे शतक पूर्ण केले. डेव्हिड मलानने 33 चेंडूत मालिकेतील पहिले अर्धशतक पूर्ण केले. मलानपाठोपाठ बटलरने 30 चेंडूत अर्धशतक साकारले. हे दोघे भारतासाठी चिंता ठरत असताना भुवनेश्वर मदतीसाठी धावून आला. त्याने बटलरला पंड्याकरवी झेलबाद केले. आपल्या 52 धावांच्या खेळीत बटलरने 4 षटकार आणि 2 चौकारांची आतषबाजी केली. बटलरनंतर शार्दुल ठाकूरने जॉनी बेअरस्टोला माघारी धाडत इंग्लंडला अडचणीत टाकले. बेअरस्टोने 7 धावा केल्या. त्यानंतर दबावात खेळणारा मलानही शार्दुलचा बळी ठरला. त्याने 9 चौकार आणि 2 षटकारांसह 68 धावांची खेळी केली. मग कर्णधार मॉर्गनही अपयशी ठरला. त्याला पंड्याने झेलबाद केले. यानंतर इंग्लंडची विजयाची आशा मावळली. भारताकडून शार्दुल ठाकूरला तीन, भुवनेश्वरला दोन तर, नटराजन आणि पंड्याला प्रत्येकी एक बळी घेता आला. भुवनेश्वरने 4 षटकात 15 धावाच देत दोन महत्त्वाचे गडी गारद केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button