IND Vs AUS 2nd Test: अजिंक्य रहाणेची शानदार अर्धशतकी खेळी
मेलबर्न – विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेला अखेरीस सूर गवसला आहे. बॉक्सिंग डे कसोटीत मेलबर्नच्या मैदानावर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा नेटाने सामना करताना अजिंक्यने 113 चेंडूंमध्ये दमदार अर्धशतक झळकावलं आहे. यानिमित्ताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीत ५० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अजिंक्यला स्थान मिळालं आहे.
दरम्यान, भारताने काल पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर संपुष्टात आणला होता. त्यानंतर दिवसाअखेर भारताने १ बाद ३६ धावा केल्या होत्या. तर आज दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला चांगली टक्कर दिली आहे. भारताकडून युवा खेळाडू शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी सावध सुरुवात केली. परंतु कमिन्सने मोक्याच्या क्षणी दोन बळी घेत भारताला धक्के दिले. पहिल्या सत्राअखेरीस भारताने ३ गडी बाद ९० धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर कर्णधार अजिंक्यने हनुमा विहारी आणि ऋषभ पंत यांच्यासोबत अर्धशतकी भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला वरचढ होण्याची संधी दिली नाही. विहारी आणि पंत माघारी परतल्यानंतर अजिंक्यने आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
आज दिवसाच्या सुरुवातीला गिल आणि पुजाराने कांगारुंच्या माऱ्याचा सावधपणे सामना केला. या दोघांची जोडी जमतेय असं वाटत असतानाच शुबमन गिल कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या गिलने ६५ चेंडूत ८ चौकारांसह ४५ धावा केल्या. यानंतर ठराविक अंतराने चेतेश्वर पुजाराही कमिन्सच्या गोलंदाजीवर १७ धावा काढून माघारी परतला. दोन बिनीचे शिलेदार माघारी परतल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांनी मैदानात येत भारताचा डाव सावरला. फारशी जोखीम न स्विकारता दोन्ही फलंदाजांनी धावफलक हलता ठेवत भारतीय संघाची अधिक पडझड होऊ दिली नाही. मात्र हनुमा विराहीदेखील २१ धावा करून बाद झाला. तर रिषभ पंत ४० चेंडूंमध्ये २९ धावा करून माघारी परतला.