विद्यमान निष्क्रिय खासदार पराभूतच होणार आहे
शिवाजीराव आढळराव पाटील यांची अमोल कोल्हे यांच्यावर टीका
पुणे : मागील पाच वर्षात शिरूर मतदारसंघात एक रुपयाचा देखील निधी आणला नाही. 80 टक्के खासदार निधी वाया गेला. विद्यमान खासदार मतदार संघात फिरकलेच नाहीत. अनेक गावात त्यांच्या विरोधात बॅनर लागले आहेत. असा निष्क्रिय खासदार पराभूतच होणार आहे. दुसऱ्यांवर टीका करून सहानुभूती मिळवण्याचा ते प्रयत्न करत आहेत, अशी टीका महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विद्यामान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर केली.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांची आज मांजरी परिसरात प्रचार रॅली आयोजित करण्यात आली. मांजरी बुद्रुक येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचार रॅलीला सुरुवात झाली. वाजत गाजत काढण्यात आलेल्या या प्रचार रॅलीला नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळाला. यामध्ये मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी यामध्ये आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे, हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉ. शंतनु जगदाळे, कार्याध्यक्ष अमर तुपे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, विद्यमान खासदार पाच वर्षात एकदाही मतदार संघात उपस्थित राहिले नाही. त्यांचा 80 टक्के निधी परत गेला आहे. शिवाय केंद्रातून एकही रुपयाचा निधी त्यांना आणता आला नाही. गावोगावी त्यांच्या विरोधातील फलक लावले आहे. त्यामुळे जनतेच्या मनामध्ये त्यांच्या विषयी आक्रोश आहे. आज पर्यंत मी केलेल्या प्रचाराला उस्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. माझ्या प्रचाराला मिळत असलेल्या प्रतिसाद पाहता हडपसर मतदार संघातून मला सर्वाधिक मताधिक्य मिळेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.