दहावी, बारावीच्या विद्यार्थी संख्येत वाढ! राज्य मंडळाने दिली माहिती
पुणे | राज्य मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात एक माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतली जाणार आहे. यंदा या परीक्षेसाठी झालेल्या विद्यार्थी नोंदणीतून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षीच्या तुलनेत वाढल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे यंदा अचानक विद्यार्थिसंख्या का वाढली याचा अभ्यास राज्य मंडळाकडून करण्यात येत आहे.
राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत होणार आहे. या परीक्षेसाठी अर्जनोंदणी प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये सुरू करण्यात आली. दर वर्षी दहावीच्या परीक्षेसाठी सुमारे १५ लाख ७५ हजार विद्यार्थी, तर बारावीसाठी सुमारे १४ लाख ६० हजार विद्यार्थी नोंदणी करतात. गेल्या वर्षी दहावीच्या १५ लाख ६१ हजार विद्यार्थ्यांनी, तर बारावीच्या १४ लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
हेही वाचा – आयोध्येत २२ जानेवारीलाच बाळाचा जन्म व्हावा यासाठी गर्भवती महिला आग्रही!
या पार्श्वभूमीवर यंदाच्या नोंदणीमध्ये विद्यार्थिसंख्या वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात दहावीची विद्यार्थिसंख्या १६ लाख १० हजार जास्त, तर बारावीची विद्यार्थिसंख्या १५ लाख १५ हजार विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केल्याचे दिसून आले आहे. तसेच अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी आणखी मुदत असल्याने विद्यार्थिसंख्येत भरच पडणार आहे.