गृहमंत्र्यांच्याच गावात बंदोबस्तावरील पोलीस उपाशी, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हाल
नागपूर ः नागपुरात हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. यावेळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झालेली पाहायला मिळाली. मात्र, नेतेमंडळींच्या सुरक्षेसाठी बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची उपासमार सुरु असल्याचं चित्र समोर आलं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पोलीस कर्मचाऱ्यांचे हाल झाले असून राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गावात बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
काही पोलीस कर्मचारी आज सकाळपासून मोर्चाच्या बंदोबस्तावर होते. त्यामुळे अनेकांना जेवण मिळालं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पोलिसांच्या जेवणाच्या स्टॉलवर जेवण अपूर्ण पडल्याने अनेक पोलिसांना उपाशी राहावे लागले. पोलिसांना 250 रुपयांत 10 दिवसांच्या जेवणाचे कूपन देण्यात आले होते. मात्र कूपन घेऊन देखील जेवण कमी पडले होते. त्यामुळे बंदोबस्तावर आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अडचणींचा सामना करावा लागला.
राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी पोलिसांच्या या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. पोलिसांचा फक्त गैरवापर हे सरकार करत आहे. आता तर कहर झाला आहे. दिवसभर सुरक्षा करणाऱ्या पोलिसांना चार वाजले तरी जेवणाचा पत्ता नाही. अधिवेशनासाठी खर्च करण्यात आलेला पैसा कुठे जातो?, असा सवाल विद्या चव्हाण यांनी उपस्थित करत राज्य सरकारला जाब विचारण्याचा प्रयत्न केला आहे.