महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारवर तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. “राज्यात महिलांवर बलात्कार होत आहेत. कायदा सुव्यवस्था बिघडत आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली तर, ते निर्लज्ज उत्तर देऊन उत्तर प्रदेशाचे दाखल देतात. छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी सरकारचा कडेलोट केला असता,” अशा शब्दांमध्ये चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. ठाण्यातील एका कार्यक्रमामध्ये बोलताना चित्रा वाघ यांनी आमच्या पक्षाला फ्लावर समजू नका आणि आम्ही फायर आहोत, अशी फिल्मी स्टाइल डायलॉगबाजीही केली. वर्तकनगर येथील भीमनगर भागात भाजपा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पडला. त्यावेळी चित्रा वाघ त्या बोलत होत्या. “किसननगर आणि वर्तकनगरमधील पक्ष प्रवेश म्हणजे ठाण्यातील मिशन कमळला मिळालेला शुभ संकेत आहे. तसेच ठाण्यात भाजपा फुटणार आशा वावड्या उठविणाऱ्यांना किसनगरचा पक्ष प्रवेश ही एक चपराक आहे,” असे चित्रा वाघ यांनी कार्यकर्त्यांसमोर भाषण देताना म्हटलं.
“ठाण्यात सत्ताधारी शिवसेनेला पाणी आणि गटार समस्याही सोडविता आलेल्या नाहीत. दोन मंत्री असूनही परिवहन सेवा सक्षम नाही. एकहाती सत्ता येणार असे म्हणणाऱ्यांना खिंडार पडल्याशी राहणार नाही आणि त्यांचे एकहाती सत्तेचे दिवास्वप्न राहील,” असेही चित्रा वाघ म्हणाल्या. “ठाण्यात महिला अधिकाऱ्याची बोटे छाटली, डोंबिवली बलात्कार प्रकरण यामुळे कायद्याचे धिंडवडे निघाले आहेत. महिलांवरील गुन्ह्यांसंदर्भात जे बोलतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहे. किती गुन्हे दाखल झाले तरी आम्ही गप्प बसणार नाही,” असेही चित्रा वाघ यांनी सांगितले. :क्लस्टर योजनेचे बॅनर लावून ठाणेकरांना फसवण्याचे काम सुरू असून त्याचा जाब विचार,” असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना केलं. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही ठाण्यामध्ये बोलताना शिवसेनेवर टीका केली. मराठी माणसाला वाऱ्यावर सोडून देशोधडीला लावण्याचं काम शिवसेनेनं केलं अशी टिका त्यांनी ठाण्यात सोमवारी केली. त्यामुळेच सर्वसामान्य मराठी माणसांना भाजपाशिवाय पर्याय नाही असंही दरेकर यावेळी म्हणाले. वर्तकनगर परिसरातील शिवसेनिकांनी देरेकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यावेळी तें बोलत होते.
शिवसेनेचे शक्तीस्थान हे तळागाळातील लोक आहेत. शाखा प्रमुख ही शिवसेनेची ताकद आहे. परंतु आताच्या शिवसेनेत दम नाही म्हणून शाखाप्रमुख भाजपामध्ये प्रवेश करीत आहेत. शिवसेनेचा डोलारा हा शिवसैनिकांच्या कामामुळे उभा राहिला. परंतु सतेचा फायदा शिवसैनिकला मिळत नाही. त्यामुळे ज्या शिवसैनिकांच्या जीवावर शिवसेना उभी राहिली, तो शाखाप्रमुख आणि उप-शाखाप्रमुख नाराज असेल तर, शिवसेनेची महाविकास आघाडीत फरफट होत आहे, असे प्रवीण दरेकर यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे एकमेकांवर टीका करतात. पण ते पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू शकत नाही. तसेच मालमत्ता कर माफीचे गाजर दाखवलं जात आहे, असेही दरेकर म्हणाले. भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये असताना साध्या नगरसेवक निवडणुकीचं तिकीट मिळाले नाही. परंतु भाजपाने मला पक्षात घेऊन विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते पद दिले. त्यामुळे गाडी फुल व्हायच्या आधी या नंतर लटकत यावे लागले, असेही दरकेर यांनी म्हटले आहे. मराठी माणसाला शिवसेनेने वाऱ्यावर सोडले असून त्यांचे सोयरसुतक शिवसेनेला नाही. त्यामुळे मराठी माणसाला भाजपाशिवाय पर्याय नाही, असेही ते म्हणाले.