हिंदूत्ववादी सरकारच्या राज्यात हिंदू शेतकरी वाऱ्यावर; नाना पटोले यांची टीका
मुंबई : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना राज्य सरकारकडून केवळ मदतीची घोषणा केली आहे, ही मदत अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही. राज्यातील भाजपप्रणीत सरकार हे हिंदू हिताचा केवळ देखावा करत आहे. प्रत्यक्षात हे सरकार शेतकरीविरोधी आहे. हिंदूंचे सरकार आले असून सण, उत्सव आनंदात साजरा करा असा डांगोरा पिटणाऱ्यांच्या राज्यातच हिंदू शेतकरी मात्र मदतीपासून वंचित आहेत, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही, आजही पंचनामेच सुरू आहेत. शेतकऱ्यांबद्दल कळवळा दाखवण्यासाठी भाजपच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी यवतमाळच्या एका गावातील शेतकऱ्याच्या घरी मुक्काम केला. पण नंतर त्याच शेतकऱ्याने आत्महत्या केली. आता कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती दाखवण्यासाठी एक कार्यक्रम जाहीर केला, पण तो केवळ दिखाऊपणा होता. त्यातून शेतकऱ्यांच्या समस्या दूर होणार नाहीत. वेगवेगळय़ा राज्यांतील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्यासाठी भाजप काळय़ा पैशांचा वापर करत आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी साडेतीन हजार कोटी रुपये खर्च केल्याची चर्चा आहे. हा काळा पैसा भाजपकडे कुठून येतो याची सीबीआय, ईडीमार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही पटोले यांनी केली.