#Covid-19: देशात पुन्हा लॉकडाउन लागणार का?; केंद्राने दिलं स्पष्ट उत्तर
नवी दिल्ली |
देशाला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला असून दैनंदिन रुग्णसंख्या उच्चांक गाठत आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना अनेक राज्यांमध्ये आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण झाल्याने केंद्र सरकार चिंतेत आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने अनेक राज्यांनी लॉकडाउनचा पर्याय निवडला आहे. दरम्यान केंद्र सरकार संपूर्ण देशात लॉकडाउन लावणार का ? अशी विचारणा होत आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लॉकडाउनचा विचार करण्याचे संकेत दिले आहेत.
बुधवारी निती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी पत्रकार परिषदेदरम्यान लॉकडाउनच्या पर्यायावर चर्चा सुरु असल्याची माहिती दिली. व्ही के पॉल हे टास्क फोर्सचे प्रमुखदेखील आहेत. एकीकडे अनेक तज्ञ आणि राजकीय नेते करोनाच्या दुसऱ्या लाटेसोबत लढण्यासाठी पंतप्रधानांना लॉकडाउन लावण्याचा सल्ला देत असताना नितीन आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी सांगितलं की, “१० टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी दर आणि ६० टक्क्यांहून आयसीयू बेड्सची व्याप्ती असणाऱ्या राज्यांना आधीच नाईट कर्फ्यू आणि कठोर निर्बंध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत”. “स्पष्ट आणि संतुलित निमयावली देण्यात आली आहे. त्याचवेळी अजून काही निर्बंध वाढवण्याची गरज असेल तर त्या पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो आणि गरजेप्रमाणे ते निर्णय घेतले जातील,” असं व्ही के पॉल यांनी सांगितलं आहे. राज्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे यापूर्वीच देण्यात आली असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
वाचा- #Covid-19: आंतरराज्य प्रवासासाठी करोना चाचणीचे बंधन नको- ICMR