#Covid-19: निर्बंधांचं पालन केलं नाही तर…; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा महाराष्ट्रातील जनतेला इशारा
![#Covid-19: निर्बंधांचं पालन केलं नाही तर…; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा महाराष्ट्रातील जनतेला इशारा](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Rajesh-Tope-4-1.jpg)
मुंबई |
काल राज्यात ३६ हजार करोना रुग्ण आढळून आले असून आपण आता हळू हळू तिसऱ्या लाटेकडे वाटचाल करत असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.ते जालन्यात बोलत होते. “आता लावलेल्या निर्बंधाचं पालन करणं गरजेचं असून जे निर्बंध पाळणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवे,” असंही टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. याशिवाय निर्बध कडक करावे लागतील असा इशारा देखील टोपे यांनी दिलाय. मास्क नसेल तर दंड करा, गर्दी टाळा असे आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले जातील असंही टोपे म्हणाले. करोना रुग्णांची संख्या वाढली तरी घाबरून जाण्याची गरज नाही असंही टोपे म्हणाले. निर्बंधाचं पालन न केल्यास आणखी कठोर निर्बंध लावावेच लागतील, असंही त्यांनी म्हटलंय.
ज्यावेळेत लोकांना कुठल्या गोष्टींची आवश्यकता नाही त्यावेळेत निर्बंध आणता येईल का याबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाणार असून मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील असंही टोपे म्हणाले. मात्र भविष्यात रुग्णसंख्या वाढली तर कठोर निर्बंधाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असही टोपे म्हणाले. देशात करोनाचा विस्फोट झाला आहे. संसर्गसाठी गर्दी टाळली पाहिजे. गर्दी टाळली तरच संसर्ग कमी होईल असंही त्यांनी सांगितलं. चित्रपट, नाट्यगृह,मंदिरं याबाबत लगेचच निर्बंध लावण्याचा प्रस्ताव नसून गरज पडली तर निर्बंध लावले जातील. मात्र या ठिकाणांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी पाऊले उचलण्याची गरज असल्याचे टोपे यांनी सांगितले. अनेक जिल्ह्यात शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या ठिकणी करोना रुग्णसंख्या वाढत आहे त्यामूळे तो निर्णय घेण्यात आल्याचे देखील टोपेंनी स्पष्ट केलं.
धारावीमध्ये एक हजार रुपयात लस घेतल्याच प्रमाणपत्र देणारी टोळी पकडली त्यांच्यावर सरकारकडून सक्त कारवाई केली जाईल असंही टोपे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री, माझ्यात आणि शरद पवार यांच्यात बैठक झाल्याचं टोपे यांनी मान्य केलं असून चर्चा होत असतात मात्र अंतीम निर्णय हे मुख्यमंत्रीच घेतात, असंही टोपे यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री यांच्याकडे प्रस्ताव जात असतात त्यांच्याकडे गेलेला प्रस्ताव मान्य झाल्यासच अधिसूचना काढल्या जातात, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, राज्यात लसीकरण वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून १० तारखेनंतर बुस्टर डोस घ्यावा. या महामारीतुन नागरीकांना फक्त लस वाचवेल अशी विनंतीही त्यांनी नागरिकांना केलीय. लसीकरणामुळे करोना बाधितांची संख्या कमी झाली असून पूर्वीपेक्षा कमी रुग्ण संख्या आहे, असंही ते म्हणाले.