आला हिवाळा आरोग्य सांभाळा – डॉ. नीरज आडकर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Bone.jpg)
साधारणपणे नोव्हेंबर महिन्यापासून हिवाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात होते. हिवाळा म्हटलं की
लोकांना गुलाबी थंडीची जाणीव होते. परंतु हिवाळ्यामध्ये अनेक आजार आपले डोके वर काढतात. यातच तरुणवर्गापासून ते वृद्धांपर्यंत सर्वाना सतावणारा आजार म्हणजे “संधीवात.” तरुणपणी गुलाबी वाटणारी थंडी वयोमानाप्रमाणे बोचरी वाटायला लागते. उन्हाळ्यात कमी दुखणारे सांधे हिवाळ्यात जास्त दुखायला लागतात. साधारणतः वयाच्या तिशी नंतर हा आजार होतो. परंतु आजकाल बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, खाण्या पिण्याच्या सवयी या सर्वांमुळे संधिवात सर्वच वयोगटात आपल्याला पाहायला मिळत आहे.
हिवाळा आणि संधिवात यांचा अगदी जवळचा संबंध आहे. हिवाळ्यामध्ये सांधे आखडणे, सुजणे, इत्यादी अनेक प्रकारच्या तक्रारी सुरु होतात. आपण शरीराची हालचाल कमी प्रमाणात करतो त्यामुळे सांधे अजून आखडल्यासारखे वाटतात. जसजसा हवामानाचा पारा खाली उतरू लागतो तसतसे सांधेदुखी डोके वर काढू लागते सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यासाठी हिवाळा हा वेदनादायक ठरू शकते.परंतु या काळात सांधेदुखीच्या रुग्णांची स्थिती क्लेशदायक होते.
हिवाळ्यामध्ये संधिवातावर काय काळजी घ्याल:-
– थंडीमध्ये मऊ आणि उबदार कपडे घाला.
– डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित आणि योग्य व्यायाम करा.
– योग्य, चांगला आणि सकस आहार घ्या.
– थंडीमध्ये शरीराला पाण्याची कमतरता जाणवते त्यामुळे भरपूर प्रमाणात पाणी प्या.
– कमी शारीरिक हालचालीमुळे सांधेदुखीच्या रुग्णांमध्ये वजन वाढण्याची शक्यता अधिक असते.
त्यामुळे वेदनांमध्ये ही वाढ होते म्हणून वजन नियंत्रणात ठेवा.
– व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे सांधेदुखीचा आजार बळावू शकतो मात्र पूरक जीवनसत्त्वे आपल्या
आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्या.