‘म्हणून डाव्या विचारसरणीच्या लोकांना मोर्चाची परवानगी नाकारली!’
मुंबई | मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांचे CAA आणि NRC बाबतचे विधान सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. भारतात जन्माला आलो असलो तरी आपल्याकडे जन्म दाखला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र वेळ येईल तेव्हा आपण सिद्ध करू असंही त्यांनी नमूद केले आहे. हे सांगताना त्यांनी डाव्या विचारसरणीच्या लोकांना मोर्चा काढण्याची परवानगी दिली नसल्याचंही स्पष्ट केले आहे.
मुंबईतील शांतता भंग होऊ नये, म्हणून मोर्चा काढण्याची परवानगी नाकरल्याचे संजय बर्वे यांनी स्पष्ट केले आहे. CAA आणि NRC विरोधात पुकारण्यात आलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या धरणे आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी प्रकाश आंबेडकर आंदोलन करण्यावर ठाम आहेत. पोलिसांनी त्यांचे काम करावे. आम्ही राजकीय पक्ष आहोत आणि आम्ही आंदोलन करणारच अशी भूमिका आंबेडकरांनी घेतली आहे. त्यामुळे आंदोलनाचा मुद्दा चिघळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या एनआरसी आणि सीएए कायद्याविरोधात हे धरणे आंदोलन आहे. दादर टीटी, ऑगस्ट क्रांती मैदान आणि धारावी, अशा ठिकाणी हे धरणे आंदोलन आहे. त्यामुळे आता पोलीस काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.





