‘जे पोलीस आधी पकडायचे ते आता संरक्षण करतात’; गुलाबराव पाटलांचं वक्तव्य चर्चेत
शरद पवार कधी काय करतीय याचा भरवसा नाही
जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आक्रमक भाषण करतात. शेरोशायरी, मिश्किल टोलेबाजीही करतात. एखाद्या वेळी बोलता बोलता असं काही बोलतात की राज्याच्या राजकारणात खळबळ उडवतात. दरम्यान जे पोलीस आधी पकडायचे ते आता संरक्षण करतात, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले की, ते शरद पवार आहेत ना, ते कलाकार आहेत आणि शरद पवार म्हणजे चावी! ती चावी कुठेही चालते. त्यांनी काँग्रेसला पटवले, उठोबा पाटोबाला एक माणूस पटवला. अशी मिसळ तयार झाली अन् ११ मते घेऊन पाहुण्यांना पाडून आले.
गुलाबराव पाटील यांनी सुरूवातीच्या काळातील शिवसेनेतील संघर्षाच्या आठवणी सांगितल्या. आपला प्रवास कुठून कुठपर्यंत झाला याची माहितीच त्यांनी दिली. जे पोलीस आधी पकडायचे ते आता संरक्षण करायला माझ्या मागे असतात. १९९०/९२ मध्ये गणपती उत्सवात तेव्हा पोलीस मला पकडण्यासाठी माझ्या मागे असायचे. गणपती, दुर्गा पूजा, शिवजयंती असे सण आले की पोलीस मला पकडण्यासाठी मागे असायचे. पण आता बरं वाटतं, पोलीसांची एक गाडी मागे एक गाडी पुढे, काय रूबाब आहे ना? माणसाचे दिवस कसे बदलतात, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
आमच्या पुढाऱ्यांना भानगडी पाहिजे असतात, भानगड केली नाही तर आमचं पोट भरत नाही, असं खळबळजनक विधानही गुलाबराव पाटलांनी केलं आहे.