कॅनडाला जाणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी; भारत-कॅनडा थेट विमानसेवा सुरू, जाणून घ्या नियमावली
नवी दिल्ली |
कॅनडात राहणाऱ्या हजारो भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कॅनडाने सुमारे ५ महिन्यांनंतर भारतातून थेट उड्डाणांवरील बंदी उठवली आहे. भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु असताना कॅनडाने एप्रिलमध्ये ही बंदी घातली होती. त्यानंतर आता विमान सेवा देणाऱ्या कॅनडा एअर सोमवारपासून दोन्ही देशांदरम्यान थेट उड्डाणे सुरू करू शकणार आहे. त्याचबरोबर, भारतातील एअर इंडिया ३० सप्टेंबरपासून उड्डाण सुरू करू शकणार आहे. भारतातील वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कॅनडा सरकारने भारतातून प्रवासी उड्डाणांवर लावण्यात आलेली बंदी रविवारी उठवली आहे. याआधी कॅनडाने भारताकडून सर्व थेट व्यावसायिक आणि खाजगी प्रवासी उड्डाणांवरील बंदी २६ सप्टेंबरपर्यंत वाढवली होती., आता निर्बंध संपल्याने, भारतातील प्रवासी २७ सप्टेंबरपासून काही उपायांसह कॅनडाला जाऊ शकणार आहेत. यासाठी नकारात्मक कोविड अहवाल महत्त्वाचा असणार आहे.
ट्रान्सपोर्ट कॅनडाने यासंदर्भात ट्विट करत म्हटले आहे की, “२७ सप्टेंबरपासून भारतातून येणाऱ्या थेट फ्लाइट्स कॅनडामध्ये उतरू शकतात. मात्र अतिरिक्त सार्वजनिक सुरक्षेचे उपाय करावे लागतील. प्रवास करणाऱ्यांना दिल्ली विमानतळावरील मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून करोना विषाणूच्या आरटीपीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल दाखवावा लागेल. हा अहवाल विमानाच्या उड्डाणाच्या १८ तासांच्या आतला असणे आवश्यक आहे.” कॅनेडियन सरकारच्या प्रवासी नियमांमध्ये कॅनडाला जाणाऱ्या प्रवाशांना विमानात चढण्यापूर्वी लॅबने जारी केलेला क्यूआर कोड अहवाल एअरलाईनला दाखवावा लागेल असे म्हटले आहे. ज्यांना पूर्वी करोना लागण झाली होती त्यांनी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून सकारात्मक अहवाल सादर करावा लागेल. ही चाचणी कॅनडासाठी प्रवास करण्याच्या १४ ते १८० दिवसांच्या दरम्यान असावी लागणार आहे. दरम्यान, कॅनडाने भारतीय प्रवाशांसाठीची बंदीची मुदत आणखी वाढवली होती. कॅनडाने भारतातील उड्डाणे २१ सप्टेंबरर्यंत स्थगित केली होती. करोना विषाणूचा धोका लक्षात घेऊन कॅनडाने हा निर्णय घेतला आहे असे सांगण्यात आले होते. तसेच कॅनडाने आपल्या नागरिकांना पुढील सूचना येईपर्यंत करोनाचा धोका लक्षात घेऊन देशाबाहेर प्रवास टाळण्याचे आवाहन केले होते.