प्रसिद्ध कन्नड चित्रपट दिग्दर्शक के. व्ही. राजू काळाच्या पडद्याआड
टीम ऑनलाइन
प्रसिद्ध कन्नड चित्रपट दिग्दर्शक के. व्ही. राजू यांचं शुक्रवारी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. बेंगळुरूमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. के. व्ही. राजू हे ६७ वर्षांचे होते. “शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. राजाजी नगर इथल्या त्यांच्या घरी निधन झालं”, अशी माहिती कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सचे डी. आर. जयराज यांनी बोलताना दिली.
वयामुळे त्यांची तब्येत खालावली होती आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं, असं जयराज म्हणाले. के. व्ही. राजू यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. “जयराज हे उत्कृष्ट दिग्दर्शक होते, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांनी चित्रपटसृष्टीत नाव कमावलं,” असं जयराज यांनी सांगितलं.
के. व्ही. राजू यांनी १९८२ मध्ये त्यांचा भाऊ के. व्ही. जयराम यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ‘बडाडा हूवू’ या कन्नड चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. १९८४ मध्ये ‘ओलावे बडुकू’ या चित्रपटातून त्यांनी पटकथा लेखक आणि दिग्दर्शक म्हणून ठसा उमटवला. संग्राम, बंधन मुक्त आणि युद्धकांडा असे त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. १९९१ मध्ये अमिताभ बच्चन आणि जया प्रदा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘इंद्रजीत’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करून के. व्ही. राजू यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.